Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

'सम्राट' सुहास शिरवळकर

सुशिंचे पुत्र श्री. सम्राट शिरवळकर यांनी आपल्या वडीलांविषयीचे काही अनुभव सांगितले आहेत. ते दोन लेख पुढीलप्रमाणे :

दुनियादारी'ची बीजे...

‘दुनियादारी’ सुहास शिरवळकरांनी 1980 मध्ये लिहायला घेतली, त्यामागे ‘चला, आता कॉलेज- विश्वावर एक कादंबरी लिहून टाकू!’ इतकी उथळ प्रेरणा निश्चितच नव्हती... ‘दुनियादारी’साठी त्यांनी खास असा काही अभ्यास केलाच नाही का? तर केला, नक्कीच केला... ‘दुनियादारी’ लिहिण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा महाविद्यालयीन घटनांच्या विश्वात त्या वयाचं होऊन वावरण्याची संधी घ्यावी लागली... पुण्यातील ‘एस. पी. कॉलेज’ आणि त्या समोरील ‘उदय विहार’ या हॉटेलात काही निमित्ताने त्यांचे जाणे झाले आणि तिथे त्यांना एक एक पात्र भेटत गेली. इतकी, की ‘सुशि’ त्या ग्रुपचे एक सदस्यच बनले. स्वत:च्या कॉलेज जीवनातील अनुभव आणि या ‘कट्टा गँग’च्या रूपाने नव्याने झालेल्या भेटी यातूनच पुढे ‘दुनियादारी’ साकारली.


कादंबरीतील श्रेयस, डी. एस. पी., अशक्या, एम. के. इत्यादी पात्रे खरी असली तरीही ती सर्व एकाच ठिकाणी भेटली असे नाही किंवा त्या पात्रांचे हे ‘चरित्र’ नाही. ही शिरवळकरांच्या भाषेत ‘काल्पनिक सत्यकथा’ आहे. ती प्रातिनिधिक आहे, परंतु त्याच वेळी सार्वत्रिक आहे. यासाठी ‘कट्टा गँग’च्या सदस्यांच्या वारंवार गाठीभेटी झाल्या; कधी ग्रुपने तर कधी ‘पर्सनल’. या पात्रांतील एम. के. आणि दिग्या आज नाहीत. साईनाथ, अशक्या ही पात्रे अस्तित्वात आहेत. श्रेयस हे लेखकाचे स्वनिर्मित पात्र आहे. ‘दुनियादारी’चे सिंहावलोकन करताना करताना सुशि ‘फलश्रुती’मध्ये लिहितात, ‘‘दुनियादारी’त तारुण्याची मूलतत्त्वंच पकडली गेली आहेत. म्हणूनच 1980च्या आधीच्या पिढ्यांपासून आजच्या विद्यार्थी पिढीपर्यंत सर्वांना ती आपली ‘कथा’ वाटते. कुठे ना कुठे त्यात आपला चेहरा पाहायला मिळतो. बदलते रीतीरिवाज अन् बदलत्या फॅशन्स ‘दुनियादारी’ आउटडेटेड ठरवत नाहीत! मला तर वाटायला लागलंय - ‘दुनियादारी’ ही एकच कादंबरी मी लिहिली नसती, तर माझ्या अनेक कादंबर्‍या तिच्या यशाने झाकोळल्या नसत्या! आणि हेही तितकच खरं, की मी फक्त एक ‘दुनियादारी’च लिहून पूर्ण थांबलो असतो, तरीही आजही ‘वाचकप्रिय’च राहिलो असतो.’

किस्से, प्रसंग.
1. माझ्या नकळत्या वयात आमच्या जुन्या वाड्यातील चौथ्या मजल्याच्या खोलीपुढे (जी एकच आणि एकाकी होती आणि बाबा लिखाणासाठी वापरायचे) एक लांबलचक पत्र्याचे छप्पर होते. खेळताखेळता मी आणि माझ्यापेक्षा मोठी असलेली वाड्यातील मैत्रीण त्या पत्र्याच्या टोकाशी जाऊन बसलो होतो म्हणे, पाय खाली सोडून आरामात गप्पा मारत. हे बाबांनी बघितलं आणी मोठ्या शिताफीनं पत्र्याची कमीतकमी कुरकुर होईल असे चालत येऊन पहिले आम्हा दोघांना मागून हाताची मिठी घालून उचललं. हा प्रसंग मला स्मरत नाही, एवढा मी लहान होतो. पण तो आई-बाबांकडून मी अनेकदा ऐकला आहे. तो सांगताना बाबांनी प्रसंगावधान राखलं यापेक्षा ते तसं करू शकले नसते तर... यावर त्यांचा भर जास्त असे.
2. शाळा सुटल्यावर मी घरी न येता फुलपाखरं पकडण्यासाठी मित्राबरोबर नदीकाठी फिरत बसलो. वेळ कसा गेला समजलं नाही. तेव्हा भर तापात बाबांनी मला शोधलेलं आणि त्यांचा चेहरा मला स्पष्ट आठवतो.
3. माझ्या कॉलेज जीवनात मी ज्या एकांकिका स्पर्धा केल्या, त्याच्या तालमींना उपस्थित राहून वेळोवेळी मार्गदर्शन करताना तरीही सीमारेषा ओळखून कलाकारांच्या आड न येणारे बाबा मला आठवतात.
4. शिक्षण का घ्यायचं? असा ‘साक्षात्कार’ अचानक झाल्याने परीक्षा न देता मी घरी बसलो. तेव्हा माझी आणि त्यांची ‘पार्टी’ झाल्याचे मला स्मरते. तो कठीण काळ पार करून जेव्हा मी एम. ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झालो, तेव्हा सर्वप्रथम मी घरी फोन केला. तो बाबांनीच उचलला. तेव्हा त्यांचा आनंद आणि दाटून आलेला स्वर मी कसा विसरेन! त्या काळात त्यांनी मला कसे ‘सांभाळले’!
5. माझ्या मित्रांसमवेत एक मैफल रंगली होती, ज्यात गाण्या-बजावण्याचा कार्यक्रम रात्रभर घरी चालू होता. त्यात बाबा स्वर आणि तालाची साथ करत होते आणि त्यांनी तलत, मुकेश, रफीची गाणी ‘लाजवाब’ सादर करून सगळ्यांनाच चाट पाडलं होतं.
6. महाराष्ट्रभर आपल्या आवडत्या ‘बॉबी राजदूत’वरून, वाचक-गप्पा कार्यक्रमांसाठी भटकंती करणे, लोकांना भेटणे, खवय्येगिरी करणे हा त्यांचा आवडता छंद होता. मात्र घरी पोहोचताच पत्नीच्या हातचं वरण-भाताचं जेवण जेवल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.
7. पुण्यातील ‘साहित्य संमेलनात’ सुशि जेव्हा थाटात स्टॉलवरून फिरत होते, तेव्हा त्यांच्या जोडीला त्यांचे एक स्रेही, ज्येष्ठ संपादक, लेखकदेखील होते. सुशिंभोवती वाचकांचा गराडा पडलेला पाहून त्यांनी, ‘परत कधीही तुझ्याबरोबर एका ठिकाणी एकत्र यायचं नाही, असं ठरवून टाकलं आहे.’ असे सांगितले. कारण विचारताच ते तातडीने म्हणाले, ‘अरे माझ्याकडे कोणी बघायलाच तयार नाही.’ मात्र हे प्रेमापोटी होते. स्पर्धा म्हणून नाही.
8. असंख्य वाचक आजही मुंबईत ‘अमर मंझिल’ आणि बॅ. अमर विश्वासचा शोध घेतात. ‘जाई’ कादंबरी वाचून भावूक झालेल्या एका स्त्री वाचकानं सुशिंना पत्र पाठवून कळवलं होतं की, जाई या पात्राची जी गत त्यांनी केली आहे त्यामुळे देव त्यांना कधीही क्षमा करणार नाही. ‘दास्तान’चा शेवट वाचकांना इतका लागला की, वाचकांची झोप उडवून, मुख्य पात्राचे पुढे काय झाले हे न सांगता अन्याय केल्याची अनेक पत्र आली. प्रत्येक कादंबरीत, पात्र रूपात ‘सुशि’ कोण, प्रसंग सर्व खरे आहेत का वगैरे विचारणा तर नेहमीच होते. ‘दुनियादारी’ वाचल्यानंतर सुन्न होऊन परगावहून चार चाकीने एस. पी.च्या कट्ट्याला रातोरात भेट देऊन, तिथे बसून गेलेली मंडळीदेखील आहेत. ‘थोडक्यात असं’, ‘कळप’ सारख्या कादंबर्‍यांमध्ये प्रकाशन व्यवसायाचे संदर्भ असल्याने, साहित्य विश्वाचे कान टवकारले गेले. ‘हृदयस्पर्श’, ‘मधुचंद्र’, ‘क्षणक्षण आयुष्य’, ‘निदान’, ‘तुकडा तुकडा चंद्र’, ‘जाता-येता’... असे कादंबर्‍यांना जोडलेल्या किश्श्यांचे एक स्वतंत्र पुस्तक बनू शकेल!
9. सुशिंच्या प्रत्येक कादंबरीच्या आवृत्तीचा संग्रह करणारा आणि संदर्भ कोश असलेला वाचक अजिंक्य विश्वास पुण्यात आहे. सुशिंच्या पत्रांचे वर्षभर बसून वर्गीकरण करणारे राजेंद्र पटवर्धन आहेत; तर अमित मेढेकर, कुलस्य जोशी, सचिन, मनोज जोशी, मिलिंद औटी... इत्यादी मंडळी सोशल नेटवर्कवर सक्रिय आहेत.
10. ‘दुनियादारी’सह इतर कादंबर्‍यांची पारायणं करणारी मंडळी आहेत. ‘दुनियादारी’ एकदा- दोनदा नाही पाच- पन्नास वेळा वाचलेली मंडळीही आहेत. एकच प्रत हातात लागली म्हणून ग्रुपने कादंबरीची पाने सुट्टी करून एक एक पान क्रमाने फिरवत ‘दुनियादारी’ वाचल्याचीही उदाहरणे आहेत.
11. सुशिंच्या कादंबर्‍या वाचून आदर्श वकील, इन्स्पेक्टर, डॉक्टर बनल्याची उदाहरणे आहेत. ‘सुशि’ या कॉमन प्रेमावर ग्रुप जमले, लग्न ठरली, आयुष्य बदलली आहेत. नवीन लेखक निर्माण झाले आहेत. सर्वात मुख्य म्हणजे, वाचन संस्कृती टिकून ठेवायला सुशिंच्या साहित्याची परिणामकारी मदत झाली आहे.
12. आज मराठी माणूस जगभर कामधंद्यानिमित पोहोचला आहे. तेथेही वर्षभराचा खाऊ (पुस्तके) दर भेटीत विकत घेऊन जाणारे सुशि फॅन आहेत. जागतिकीकरणाआधी जेरुसलेममधून भस्तेकर बेंजामिन नावाचे एक मराठी ज्यू (आमच्यासाठी भास्कर काका) पत्रव्यवहार करत किंवा पुण्यात येऊन भेट देऊन जात.
13. आपल्या मित्राच्या छातीत दुखतेय हे कळल्यावर त्याला ताबडतोब उपचारासाठी घेऊन जाणारे बाबा... त्यांच्या स्वत:च्या बाबतीत मात्र सर्वांनाच चकवून गेले. 11 जुलै 2003 : मी नेहमीप्रमाणे ‘अर्थशास्त्राचा’ वर्ग घेऊन घरी पोहोचलो. बाबा मुंबईत होते. आई आणि मी नित्याच्या टीव्ही मालिका सुरू करून जेवायला बसलो. तेवढ्यात फोन खणाणला. आमच्याकडे फोन येणं ही काही विशेष बाब नव्हती, बाबांकडे तेव्हां मोबाइल नसल्याने सर्व घरच्या फोनवरच चाले. मी फोन उचलताच, मुंबईतील नातेवाइकाचा आवाज कानी पडला, ‘‘सम्राट नीट ऐक, बाबांना सकाळी कसंतरीच होत होतं म्हणून मी त्यांना घेऊन जवळच्या इस्पितळात गेलो. डॉक्टर पोहोचायच्या आतच बाबा कोसळले आणि परत उठलेच नाहीत...’’. फोन संपला आणि मी मागे वळून आईला ते कसं सांगितलं, मुंबईत संध्याकाळी उशिरापर्यंत काय घडलं, पोस्टमार्टम केलेली बॉडी (?) कशी आणली आणि काय काय... त्यानंतरचं आयुष्य... मी नाही शेअर करत हे डिटेल्स. सॉरी!


सुशिं'ची झपाटलेली दुनिया!


माझे वडील काय करतात? याचं उत्तर मला कधीच द्यावं लागलं नाही. ‘सम्राट सुहास शिरवळकर’मधील सुहास शिरवळकर उर्फ (सुशि) हे सुप्रसिद्ध मराठी लेखक आहेत, हे माहीत नसणारी साहित्यप्रेमी व्यक्ती महाराष्ट्रात नवखी असेल.


बाबा दिसायला एकदम ‘चॉकलेट हिरो’ होते. मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने इतका प्रभावित होतो की, हुबेहूब त्यांची नक्कल करत असे. केसांचा भांग, त्यांच्या लकबी, प्रभावी राहणी, स्वभाव, त्यांची मातृभाषेतील स्वाक्षरी... अशा अनेक गोष्टी मी माझ्या युवा अवस्थेपर्यंत आपोआप आणि काही मुद्दाम अंगीकारल्या होत्या.

बाबांनी मला साहित्य-कलेची गोडी लावली, जुनी गाणी ऐकण्याचा छंद मला त्यांच्यामुळेच लागला. साहित्य-कलेवाचून जीवन किती रुक्ष आणि निरस बनेल, असे आपण म्हणतो. पण ते कळण्यासाठी पंचेंद्रियांवर, मनावर प्रथम संस्कार व्हावे लागतात, त्याचे श्रेय निव्वळ माझ्या वडलांचे आहे. जसा मी वयाने मोठा होत गेलो, तशी बाबांशी माझी दोस्तीच झाली. म्हणजे, तशी त्यांनी ती होऊ दिली. कोणत्याही प्रकारचे दडपण नसलेले, मुक्त वातावरण पहिल्यापासून आमच्या घरी होते. बाबा स्वातंत्र्यप्रिय, विचाराने आधुनिक होते. यामुळे माझे आणि त्यांचे नाते अतिशय घट्ट आणि मित्रत्वाचे बनले. माझे सांस्कृतिक परिप्रेक्ष्य विस्तारले, मला एका वैशिष्ट्यपूर्ण भावविश्वाचे आकलन झाले...

मी जिथे जाईन तिथे माझी ओळख, सुप्रसिद्ध लेखकाचा मुलगा म्हणून आधीच निर्माण झालेली असे. झालेली ओळख स्वीकारून, माझी स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करीत असे. कॉलेजच्या घडत्या वयात माझी वेगळी ओळख निर्माण व्हावी, असे प्रयत्न मी केले. पण ते अर्थातच फोल ठरले... मग ते नवीन मित्र जोडणे असो, नाटक करणे असो...इत्यादी. पुढे माझ्या दृष्टिकोनात बदल होत गेला. वडलांवरून मला ओळखणे, त्यांचाशी माझी तुलना करणे, अपेक्षा करणे, हे अपरिहार्य आहे, हे मला कळून चुकले. उलटपक्षी, लोकांनी माझ्यावर सहज विश्वास ठेवणे, आदराने, प्रेमाने वागणे, संभाव्य लेखक म्हणून अपेक्षा करणे, यामुळे मला जबाबदारीचे वेगळेच भान येत गेले. ते आज मला महत्त्वाचे वाटते.

मला आठवते तेव्हापासून बाबा सतत माणसांच्या गोतावळ्यात असत. त्यांचा स्वभाव दिलखुलास आणि मोकळा होता. त्यांचा वाचकवर्ग प्रचंड होता, आजही आहे. आमच्या घरी रोजच कोणी ना कोणीतरी नवीन व्यक्ती बाबांना भेटण्यासाठी येत असत. गप्पा, चर्चा झडत. त्यात वाचकांपासून प्रकाशन व्यवसाय, नव-लेखक, सिनेसृष्टीतील व्यक्तींपर्यंत कोणीही असे. वाचकांचा पत्रव्यवहार तर एक स्वतंत्र कारभारच होता. त्यांना मिळालेली लोकप्रियता, प्रसिद्धी मी लहानपणापासूनच पाहिली असल्याने, पुढे मला तिचे फारसे अप्रूप राहिले नाही. मी माझ्या ग्रेट बाबांची वाढत जाणारी लोकप्रियता पत्ररूपाने, प्रत्यक्ष, जाहीर कार्यक्रमातून बघतच मोठा झालो. एखाद्या सुपरस्टारभोवती स्वाक्षरीसाठी गराडा पडतो, तसाच एकेकाळी बाबांच्या भोवती पडे. अतिशयोक्ती नाही!

शिरवळकरांनी प्रसिद्धीपोटी, हलकल्लोळ व्हावा म्हणून, पारितोषिकासाठी, ‘साडेतीन टक्क्यांनी’ पाठ थोपटावी म्हणून, कधीही लिखाण केले नाही. उपजीविकेचे साधन हे लेखन असल्यामुळे त्यांनी त्यात सातत्य राखले. पण तरीही विषयवैविध्य ते राखू शकले. 1972ला सुरू केलेले रहस्यकथा लेखन, 1974 पासून पूर्णवेळाचे काम म्हणून त्यांनी स्वीकारले. 1979मध्ये रहस्यकथा लेखन थांबवून त्यांनी सामजिक कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. 1982मध्ये प्रकाशित झालेल्या ‘दुनियादारी’ने कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख सर्वांनाच मान्य करण्यास भाग पाडले. मात्र ‘दुनियादारी’ ही त्यांची संपूर्ण ओळख ठरू शकत नाही.
खरं तर सुहास शिरवळकरांच्या लेखनाची समीक्षा झालीच नाही. याबाबत वाचकप्रिय साहित्यप्रकाराला सरधोपटपणे सवंगतेचा शिक्का मारण्याविषयी ‘सुशिं’नी नेहमीच प्रश्न उभे केले.

मराठी साहित्य विश्वाची दृष्टी आणि कक्षा आणखी मनमोकळी, सर्वसमावेशक, समृद्ध बनण्यासाठी तिच्या मर्यादांचे उल्लंघन होणे आज गरजेचे आहे, असे मला वाटते. ‘सुशि’ स्वत:च्या लेखनाच्या संदर्भात जाहीर कार्यक्रमांमधून आपली भूमिका स्पष्टपणे मांडायचे. वाचकांव्यतिरिक्त इतर साहित्यविश्वाने या प्रकारच्या लेखनाकडे डोळेझाक न करता आपला दृष्टिकोन बदलावा, असा त्यांचा प्रयत्न होता. आपल्या अढळपदावरून त्यांनी ही मांडणी सातत्याने केली. त्यांच्या मुलाखती, वाचकांशी गप्पा, अशा जाहीर कार्यक्रमांव्यतिरिक्त अगदी नवलेखकांसाठी शिबिरे घेऊनही त्यांनी हा साहित्य प्रकार आणि त्याच्या निर्मितीतले बारकावे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी असे लिखाण करणार्‍यांचा, छापणार्‍यांचा, मानणार्‍यांचा गट मात्र स्थापन केला नाही. कुठल्याही राजकीय प्रवाहाचा ते भाग बनले नाहीत. प्रसिद्धीमाध्यमे ‘मॅनेज’ केली नाहीत. एखाद्या मनस्वी कलाकाराप्रमाणेच ते लिहीत राहिले. रसिक वाचकांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले!

‘‘माझ्या नावामागे सम्राटपद लागावे म्हणून माझ्या मुलाचं नाव मी ‘सम्राट’ ठेवलं’’, असं बाबा गमतीने म्हणत असत. पण वाचकांनी त्यांना खरोखरच हे पद बहाल केलं. इतरांनी ते ‘रेकग्नाईज’ करावं, अशी बाबांची इच्छा नव्हती. कारण इतरांवर ते अवलंबून नव्हते! सुशि हा वाचकप्रियतेचा ‘आयकॉन’ बनला आहे. इतकी प्रसिद्धी, ग्लॅमर आणि वाचकांचे प्रेम लाभलेला मराठी लेखक सुशिंशिवाय आजही माझ्या ऐकिवात नाही.!

समग्र ‘सुशि’

* सुहास शिरवळकर (सुशि) 15 नोव्हेंबर 1948 ते 11 जुलै 2003. पुणे
* सुहास शिरवळकरांनी पहिली नोकरी एम.एस.सी.बी. पुणे येथे एक वर्षासाठी केली, तर दुसरी टिटवाळा येथील शाळेत शिक्षक म्हणून एक वर्षासाठी केली. त्यानंतर निरनिराळ्या शाळांतून ‘लिव्ह-व्हेकन्सी’वर काम केले. 1974पासून मात्र पूर्ण वेळ लेखन हाच व्यवसाय केला.
* शिरवळकर उत्तम गायक व पेटी-तबला वादक होते. काही काळ ऑर्केस्ट्रामध्ये त्यांनी आपली कला आजमावून पाहिली. तसेच व्यावसायिक नाटकांतून अभिनयदेखील केला.
* ‘दुनियादारी’ ही कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली ती त्यांच्या ‘रहस्यकथा लेखक’ या मूळ ओळखीसंदर्भात. अन्यथा आवृत्त्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास, दास्तान, बंदिस्त, सॉरी सर, मुक्ती, कोवळीक, वास्तविक ... इत्यादी धरून पंधरा कादंबर्‍यांच्या दुनियादारी इतक्याच म्हणजे दहा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
* ‘दुनियादारी’ या कॉलेज विश्वाची पार्श्वभूमी लाभलेल्या कादंबरीने लक्ष वेधल्याने ‘तरुणांचे लेखक’ असा समज झाला असला, तरीही सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष वाचकांचा समावेश त्यांच्या फॅन्समध्ये होतो, असे उपलब्ध पत्रे, आजही कुटुंबीयांशी होणारे संपर्क, निघणार्‍या आवृत्त्या आणि सार्वजनिक वाचनालयातील अनुभवातून दिसते.
* शिरवळकरांची ग्रंथसंपदा : मूळ 250 रहस्यकथांचे 66 भागांत संकलन. 72 सामाजिक कादंबर्‍या. 9 कथासंग्रह, 1 किविता संग्रह, वृत्तपत्र सदर-लेखनाचे 4 संग्रह, बालवाङ्मय, एकांकिका, नभोनाट्य.
* प्रसिद्ध चित्रपट : ‘देवकी’ - महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कथा पुरस्कारासह इतर 27 पुरस्कार. ‘दुनियादारी’ सध्या सर्वत्र प्रदर्शित.
* टीव्ही मालिका : कथा, पटकथा, संवाद - कल्पांत, कोवळीक, दुनियादारी.

No comments:

Post a Comment