Friday, May 14, 2010





सुहास शिरवळकर
सुहास शिरवळकर उर्फ सु.शि. (१५ नोवे १९४८ - ११ जुलै, २००३) सुप्रसिध्द मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक.



सुहास शिरवळकर घराघरात माहित व्हावेत व घरोघरी त्यांची पुस्तके वाचली जावीत म्हणून मी इथे माझे विचार तसेच सु.शि.विषयी त्यांच्या पुस्तकातून, पेपरमधून, इंटरनेटवर अशी मिळेल तेवढी माहिती मी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

सर्वाना एकच विनंती "दुनियादारी जगा आणि जगवा"


माझे मनोगत :


मी सातवीत असल्यापासून कथा कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. वडील गावामध्ये असलेल्या लायब्ररीमधून पुस्तके घेऊन येत. ती पुस्तके मीही वाचीत असे. त्यावेळी साहित्य वगैरे या गोष्टी कळत नव्हत्या, फक्त चांगल्या कथा आहेत, वाचायला आवडत म्हणून वाचायचा नंतर जवळजवळ ११ वी पर्यंत वेगवेगळी पुस्तके वाचतच होतो. त्या पुस्तकांचे लेखक कोण आहेत, त्यांची नावे काय आहेत याकडे कधीच लक्ष दिले नाही. खर म्हणजे साहित्य, कथा, कादंबऱ्या, समीक्षक, समीक्षण हि समजच मला तोपर्यंत नव्हती. नंतर नंतर अभ्यासामुळे (१२ वी नंतर मी संगणक अभ्यासासाठी प्रवेश घेतलेला ) पुस्तकांशी संबंध जवळजवळ संपूनच गेला. काही वर्षांनी मी नोकरीसाठी मुंबईला आलो. नोकरी मिळाल्यावर आई-वडील देखील मुंबईला आले. तोपर्यंत माझी वाचण्याची सवय बंदच झालेली होती. पण वडील मात्र मुंबईला आल्यावर परत लायब्ररीमध्ये जाऊ लागले. परत वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके घरात येऊ लागली. त्यामुळे माझ्यातील वाचक परत जागा झाला. तोपर्यंत मला पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज ( वि.वा.शिरवाडकर ),राम गणेश गडकरी, आनंद यादव हेच लेखक माहित होते, तेही कारण या लेखकांचे बरेच धडे ( त्यांच्या कथा ) आम्हाला पाचवी ते दहावी पर्यंत पाठ्यपुस्तकांत होते म्हणून. वाचनाची गोडी वडिलांमुळे लागली.


साधारणता २००६ ला मी परत वाचू लागलो, आणि त्या वेळी मला कथा, कादंबरी, ललित लेखन म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला. वेगवेगळे लेखक आणि त्यांची असलेली लिखाणशैली याचा शोध मला लागला. मग कुठला लेखक किती भारी लिहितो हे पाहण्यातच माझा वेळ जाऊ लागला. अशातच 'दुनियादारी' हे पुस्तक माझ्या वाचनात आले. बाप रे ! दुनियादारी वाचल्यावर असा काही अनुभव आला की शब्दांत सांगणे केवळ अशक्य. 'दुनियादारी' वाचल्यानंतर फक्त एकच नाव माझ्या मेंदूत कायमसाठी बसले गेले ते म्हणजे 'सुशि' अर्थात सुहास शिरवळकर. तेव्हापासून एकाच ध्यास लागला सुशि आणि त्यांची पुस्तके बास ! झपाटल्यासारखी त्यांच्या सर्व कथा कादंबऱ्या वाचून काढल्या, नव्हे पारायण केली. मंदार , फिरोज , अमर आणि दारा हि त्यांची मानसपुत्र मनात घर करून राहिली तर दुनियादारी , कोवळीक, निदान , हमखास , मुक्ती , सॉरी सर , दास्तान, पहाटवारा किती सांगू अन किती नको अशा अप्रतिम कादंबऱ्यानी त्यांच्या लेखणीतून जन्म घेतला. त्यांनी आपल्या कादंबऱ्यामध्ये पात्रे, त्यांची नावे , स्थळांची नावे एवढी चपखल वापरली आहेत कि जणू ती पात्रे त्यांची नावे , स्थळांची नावे हि त्या कादंबरीसाठीच जन्माला आलेली असावीत. बर विषयही असे वेगवेगळे की माणूस कल्पनाच करू शकत नाही. त्यांनी एवढ्या रहस्यकथा लिहिल्या पण सगळ्याच आपल्याजागी आपल वेगळपण सांगणाऱ्या. एवढ्या रहस्यकथा लिहूनही कुठेही त्यांच्यात सारखेपणा नाही किंवा कुठेही वाचकाला कथा भरकटल्यासारखी वाटत नाही. त्यांनी आपल्या कथांमध्ये प्रसंगानुरूप व सहजतेने वापरलेले विनोद वाचकांना खळखळून हसवतात, जणू ते मजेदार दृश्यच वाचकांच्या डोळ्यासमोर तरळते. त्यांच्या पुस्तकांची जबरदस्त मोहिनी त्यांच्या चाहत्यांवर होती. त्यांचे पुस्तक एकदा वाचायला हातात घेतले कि वाचक पुस्तक बंदच करू शकत नाही., एवढी जबरदस्त लिखाणशैली त्यांची होती. वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लिखाणात होती. शब्दांची अचूक मांडणी आणि वाक्यात मोजके व चपखल बसणारे शब्द ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये. त्यांचे नवीन पुस्तक वाचायला घेतले कि त्याची अर्पणपत्रिका काय असेल याकडे लक्ष लागलेले असायचे, कारण त्यांच्या पुस्तकांप्रमाणेच त्यांच्या अर्पणपत्रिका सुंदर असायच्या. प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीच्या अर्पणपत्रिका अगदी अप्रतिम आहेत.


विषयांच सांगायच झाल तर किती वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लिखाण केले. मग ती 'निदान' सारखी वैद्यकीय क्षेत्रावरील कादंबरी असो वा 'हमखास' सारखी शिक्षण क्षेत्रातील क्लास संस्कृतीवरील कादंबरी असो, सगळ्याच अप्रतिम आहेत. त्यांच्या कादंबरीतील नायिका त्यांनी इतक्या अप्रतिमपणे रेखाटल्या हे 'पहाटवारातील मृणालिनी' वाचल्यावर लक्षात येत. मानवी जीवन व त्याच्या स्वभावाच सूक्ष्म निरीक्षण या सगळ्यांचा किती गाढ अभ्यास त्यांचा होता हे त्यांच्या प्रत्येक कादंबरीतून दिसून येते. 'काटेरी' मधला 'सुरेख राजदत्त' त्यातलच एक उदाहरण. एका अपंग मुलीशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय, त्यातून होणारी त्याच्या मनाची चलबिचल, भावनांचा कल्लोळ हे सगळ इतक्या अप्रतिमपणे रेखाटल आहे की माणूस वाचताना अक्षरशः थक्क होतो. साहित्याचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले. असा एकही प्रकार नाही ज्यात त्यांनी लिखाण केलं नाही. रूपमती, जमीन - आसमान सारख्या ऐतिहासिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. रहस्यकथा, कादंबरी, सदरलेखन, बालवाड्मय, नभोनाट्य / एकांकिका, एवढेच नाही तर कविता सुद्धा लिहिल्या.


त्याच्यानंतर मी पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, रत्नाकर मतकरी, रणजीत देसाई, वि.स. खांडेकर, विश्वास पाटील, भालचंद्र नेमाडे, जी.ए.कुलकर्णी, राम गणेश गडकरी हे सर्व लेखक वाचले, परत परत वाचले. पण तरीही सुशिंच्या रहस्यकथा आणि कादंबऱ्या तिथेच होत्या आणि तितक्याच श्रेष्ठ होत्या. मी तर म्हणेल की सुशि सारखा लेखक होणे नाही. त्यांची कादंबरी वाचून पूर्ण केल्यावर होणारा आनंद कादंबरी संपवल्यावर कादंबरीच्या शेवटी असणारा त्यांचा हसतमुख फोटो बघितल्यावर द्विगुणीत होतो.


आज इंटरनेटवर कुठेही गुगल वा अन्य सर्च इंजिनवर किंवा फेसबुक, ओरकुटवर त्यांच्या एवढे चाहते, एवढ्या लिंक्स आणि त्यांच्या विषयी एवढी माहिती मिळते की दुसऱ्या कुठल्या लेखकाची एवढी माहिती मिळणे केवळ अशक्य. त्यांच्यावर कितीतरी ब्लॉग, कितीतरी कम्युनिटीज इंटरनेटवर बनलेले आहेत, त्यात त्यांच्याविषयी रोज चर्चा होत असते , विचारांची देवाणघेवाण होत असते.


अशा असामान्य प्रतिभाशक्ती असलेल्या या लेखकाचा मोह देवालाही पडावा यात नवल ते काय ! म्हणून देवाने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. सुशिंच्या दुनियादारीमधलंच हे शिरीनच वाक्य आहे कि "जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते पण तिची वेळ चुकीची असते". मला वाटत माझ्याही बाबतीत तसच झाल असाव. जेव्हा सुशि होते तेव्हा ते मला कळले नाहीत, आणि जेव्हा ते मला कळले तेव्हा ते या जगात नव्हते. गोष्ट मला मिळाली होती पण वेळ चुकीची होती. सुशिंना मी भेटू शकलो नाही यासारखी दुःखाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कुठलीच नसेल. शेवटी एक गोष्ट निश्चित अगदी काळ्या दगडावरच्या रेषेसारखी, मी कायम सुशिवेडा राहील आणि माझ्या घरातले सगळेच त्यांचे चाहते बनतील असा माझा प्रयत्न असेल. आमच्या पुढील पिढ्याही त्यांचे चाहते असतील आणि त्यासाठीच त्यांची सर्व पुस्तके जमा करून मी घरामध्ये ठेवली आहेत, म्हणजे ती शेवटपर्यंत आमच्या घरातील प्रत्येकजण वाचत राहील. असे हे थोर लेखक आज आपल्यात नसले तरी ते आमच्या मनात सदैव आहेत, आणि कायम राहतील. जेव्हा आम्हाला एकाकी वाटते, मन दुखी होते, या धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा येतो तेव्हा त्यांची पुस्तके आम्हाला जगण्याची आशा देतात. त्यांची पुस्तके अमर आहेत. ती या जगाच्या शेवटापर्यंत वाचकांना वाचनाचे सुख देणार आहेत.



शेकडो वर्षानंतर असा एखादा लेखक जन्माला येतो या थोर लेखकाला शतश: प्रणाम !!! ........................................................................................ - मिलिंद औटी


१९
७४
साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु 'लोकांना आवडेल ते' अश्या मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंग्रहाच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथादेखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या 'देवकी' या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत.

सुहास शिरवळकर : साहित्यसूची (१५.११.१९४८ - ११.०७.२००३)


कादंबरी :


१. वेशीपलीकडे २. ऑब्जेक्शन, युवर ऑनर! ३. वंडर ट्वेल्व्ह ४. मुक्ती ५. कोवळीक ६. तलखी ७. इन्सानियत ८. सालम ९. सॉरी सर...! १०. जमीन - आसमान ११. वास्तविक १२. जाई १३. अंतिम १४. क्षणोक्षणी १५. स्वीकृत १६. थरारक १७. पहाटवारा १८. दुनियादारी १९. दास्तान २०. तलाश २१. बरसात चांदण्याची २२. समांतर २३. असीम २४. कोसळ २५. प्रतिकार २६. प्रयास २७. बंदिस्त २८. समथिंग २९. रूपमती ३०. निदान ३१. काटेरी ३२. म्हणून ३३. सनसनाटी ३४. तुकडा तिकडा चंद्र ३५. जाता...येता ३६. थोडक्यात असं ३७. अखेर ३८. महापर्व ३९. 'ओ गॉsड!' ४०. क्षितीज ४१. व्रतस्थ ४२. गढूळ ४३. कल्पांत ४४. अंमल ४५. डेड- एन्ड ४६. स्पेल- बाउन्ड ४७. हिंदोस्ता हमारा ४८. लटकन्ती ४९. झूम ५०. सत्र ५१. राजरोस ५२. मधुचंद्र ५३. न्याय - अन्याय ५४. हृदयस्पर्श ५५. क्षण - क्षण आयुष्य ५६. झालं - गेलं ५७. काळशार ५८. झलक ५९. पाळमुळ ६०. चूक -भूल ... देणे घेणे ! ६१. हमखास ६२. क्रमश: ६३. काळबेर ६४. सावधाSन! ६५. सूत्रबद्ध ६६. पळभर ६७. जन ... ६८. निमित्तमात्र ६९. स्टार-हंटर्स ७०. वर्चस्व ७१. कळप



कथासंग्रह :


१. एक ...फक्त एकच २. "थँक यू मि. न्यूज पेपर ३. कथा - पौर्णिमा ४. इथून - तिथून ५. एवरीथिंग... सोSसिम्पल ६. माहौल ७. शेड्स ८. मूड्स ९. मर्मबंध

सदरलेखन :


१. इत्यादी - इत्यादी २. वर्तुळातील माणस ३. फलश्रुती ४. असो ...

कुमार / बालवाड्मय :

१. स्वर्गावर स्वारी २. गर्वहरण ३. बक्षीस ४. मठ्ठ आज्ञाधारक ५. मुर्खांचा पाहुणचार



नभोनाट्य / एकांकिका :


१. 'हाSत - तिच्या' २. मानवाय तस्मे नमः ३. आवर्तन ५. जस्ट... हॅपनिंग ! ५. जस्ट... हॅपनिंग !



कवितासंग्रह :


१. सुहास शिरवळकर यांच्या कविता



रहस्यकथा :


१. उस्ताद २. शॅली - शॅली ३. शब्दवेध ४. जिव्हारी ५. सॉलिड ६. अफलातून ७. खजिना ८. चक्रव्युह ९. कलंक १०. खुनी पाऊस ११. शैताली १२. मध्यरात्रीची किंकाळी १३. गुबगुब १४. किल - क्रेझी १५. मरणोत्तर १६. हॅलो - हॅलो १७. बिनशर्त १८. जाणीव १९. मातम २०. माध्यम २१. स्टुपिड २२. जीवघेणा २३. अतर्क्य २४. सायलेन्स प्लीज २५. संशय २६. ऑर्डर - ऑर्डर २७. टेरेफिक २८. मर्डर हाऊस २९. अज्ञात ३०. अनुभव ३१. योगायोग ३२. असह्य ३३. निराकार ३४. सैतानघर ३५. चॅलेंज ३६. थरराट् ३७. भन्नाट ३८. पोलादी ३९. अवाढव्य ४०. इज्जत ४१. लास्ट बुलेट ४२. आक्रोश ४३. सन्नाटा ४४. सहज ४५. डेड शॉट ४६. पांचाली ४७. ट्रेलर गर्ल ४८. हव्यास ४९. गाफील ५०. ब्लॅक - कोब्रा ५१. गोल्ड हेवन ५२. ऑपरेशन बुलेट ५३. सफाई ५४. तो ५५. कलियुग ५६. भयानक ५७. हिरवी नजर ५८. नॉट गिल्टी ५९. हायवे मर्डर ६०. पडद्याआड ६१. धुकंधुकं ६२. कणाकणाने

चित्रपट :

'देवकी' - महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कथा पुरस्कार आणि 'महाराष्ट्र टाईम्स' , 'लोकमत' इ. २७ पुरस्कार

टी.व्ही. मालिका : कथा, पटकथा, संवाद


कल्पांत (दूरदर्शन), कोवळीक (सह्याद्री), दुनियादारी (अल्फा)


टेलिफिल्म्स : कथा, पटकथा, संवाद


गेसिंग मॅन (दूरदर्शन), असं आणि तसंही, पद्धतशीर सावज, क्षण क्षण आयुष्य, थँक यू मि. न्यूज पेपर, पंछी आणि थ्री डायमेन्शनल (ई-टी.व्ही.) चांगभल, (ई-टी.व्ही.)


सहभाग : संवाद, चर्चा इ.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा, अहमदनगर आणि कोल्हापूर मराठी साहित्य सभा, इंदोर, हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग, लेखक कार्यशाळा.



सुशिंच्या पुस्तकांप्रमाणेच त्यांच्या अर्पणपत्रिका देखील अप्रतिम आहेत. पाहुयात त्यांची एक झलक : सुरवातीला पुस्तकाचे नाव दिले आहे आणि नंतर अर्पण पत्रिका:

दुनियादारी- 1.-दिग्या, श्रेयस, नितीन, अश्क्या, साईनाथ, प्रीतम, शिरीन, मिनू, राणी मां आणि एम्‌.के.’दुनियादारी’तली ही पात्र ज्यांच्यामुळ निर्माण झाली,त्या ’कट्टा गँग’ला- -सुहास शिरवळकर दुनियादारी -२-’दुनियादारी’ची ही द्वितीयावृत्ती त्या वाचकांना-ज्यांनी अक्षरश: कादंबरीची वीस-वीस पारायणं करुन,माझ्यावर पत्रांचा वर्षाव करुन,तिला दुसऱ्या आवृत्तीचं भाग्य मिळवून दिलं! -सुहास शिरवळकर


दुनियादारी- ३ री आवृत्ती त्या सर्व वाचकांना,ज्यांनी 'दुनियादारी'विकत घेतली;वाचनालयातून वाचली;मित्राची ढापली;वाचनालयाची पळवली...पण 'दुनियादारी'वर मनापासून प्रेमच केलं!त्यांनाही,ज्यांनी 'दुनियादारी'च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला!आणि....खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम 'कट्टा-गँग्ज'ना,ज्या 'दुनियादारी' जगल्या....जगतात ....जगतील! -सुहास शिरवळकर


कोवळीक २ -री आवृत्ती चार वर्षांच्या अल्पावधीत ज्यांनी सहस्र करांनी अनुभवाचं विश्व उधळलं-त्या,बी.एम्‌.सी.सी. मधल्या समृद्ध क्षणांना!- रोल नं, वन-फोर-सेव्हन,टी.वाय्‌. 'बी' -सुहास शिरवळकर


प्रतिकार 3 आवृत्ती मुझे इंतजार है -बलात्काराच्या बातम्या होणार नाहीत...चर्चा होणार नाहीत...अशा दुर्देवी तरुणीकडे वाईट,संशयीस्वीकारासाठी हात नजरेनं पाहिलं जाणार नाही...स्त्रीच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जाणार नाही...शरमेनं समाज मान खाली घालेल...आणि,एक तरी तरुण स्वीकारासाठीहात पुढे करेल...कलम नंबर शंभरचा खरा अर्थमना-मनातून रुजेल;त्याचे उद्‌घोष होतील...-वो सुबह कभी तो आएगी! -सुहास शिरवळकर


समथिंग- ही कादंबरी मी तुला अर्पण केलीये हे लक्षात येतंय,का आपलं....नाहीच? - सुहास शिरवळकर


आँब्जेक्शन युवर आँनर - सुप्रसिद्ध आंग्ल लेखक श्री अर्ल स्टँनले गार्डनर ह्यांना -ज्यांच्या मानसपुत्रामुळे अमर विश्वास हे पात्र निर्माण झालं - सुहास शिरवळकर


शेडस्‌ - कोणत्याही चांगल्या विनोदाला खदखदून दाद देणाऱ्या आणि रहस्यकथांकडे गांभीर्याने पाहणाऱ्या कोणाही रसिक वाचकास- -सु.शि.

काळंबेरं – माथेरान मधील तीन पावसाळी दिवस-रात्रींना..... - सुहास शिरवळकर


मधुचंद्र'-विश्वामित्र पाहत असताना'मेनके'च्या ज्या प्रथम दर्शनाने मला ही कल्पना सुचली,त्या दर्शनाला-अर्थात,'भानुप्रिया'ला ही, नित्या क्षणी माझ्यासकट सर्वांचाच'विश्वामित्र' करणाऱ्या सर्व यशस्वी कला-तंत्रज्ञांनाही! -सुहास शिरवळकर


हमखास - श्री. शशिकांत अ. ठाकूर सर...मुख्याध्यापक म्हणून 'हिरालाल सराफ' प्रशालेतून निवृत्त होण्यापूर्वी,ज्यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळणं,शिक्षण-खात्याला भूषणावह ठरलं असतं;आणि, तो न मिळताही,ते 'आदर्श शिक्षक'च राहिले!त्यांच्या कळकळीला...सेवाव्रताला...आदरपूर्वक अर्पण.-माजी विद्यार्थी,'शिऱ्या'. -सुहास शिरवळकर


ह्रुदयस्पर्श- मीत...तुला-म्हणजे, तुला-म्हणजे, तुलाच का माहितीये -? -सुहास शिरवळकर

क्षणोक्षणी - प्रत्येक कादंबरीत काही तरी आशय असलाच पाहिजे-असं न मानणाऱ्या गोष्टी-वेल्हाळ वाचकाला- -सुहास शिरवळकर





आता झलक सु.शि.च्या काही पुस्तकांची

…’दुनियादारी’…हेच बदल म्हणजे जीवन असेल तर कशाकरता जगायचं ते? पतंग आपला फाटतोय…गोते खातोय…त्याला खाली हापसायचा.ठिगळं लावून पुन्हा उडवायचा. मध्येच मांजा तुटला कि सारी पोरं पतंग धरायला ‘है॓sss’ करुन धावतात.जिवाच्या आकांतानं आपणही त्यांच्या बरोबर दमबाजी करीत पळायचं.‘एssसो ss ड…सोड!भैं…द!हात तोडून टाकीन!’ म्हणत पतंगपुन्हा पकडायचा. गरम छातीनं, पेटके आलेल्या पोटयांनी परत जागेवर यायचं-तुटलेल्या मांज्याला पक्क्या गाठीमारायच्या…पुन्हा पतंग आपला आकाशात!का रे बाबा एवढा सोस?तर फाटका,ठिगळं लावलेला…कसाही का असेना …आमचा पतंगही आकाशात उडतो आहे!…देख!तिच्यायला! त्यापेक्षा ठिगळांसकट, गाठींच्या मांज्या-सकट, त्या पतंगाची जाळून राख करुन, द्या चिमूट-चिमूटसगळ्या धावणायांच्या हातात !…खा प्रसाद म्हणून. नाही तर,लावा कपाळाला अन्‌ नाचा…आकाशात फडफडायला दुसया एखाद्या डौलदार पतंगाला जागा झाली म्हणून!


असीम’ - ‘वर्षा–’‘आवाज चढवू नकोस कौस्तुभ, हे तुझं किंवा माझं घर नाही–रस्ता आहे!तुला आठवतं-त्या दिवशी मी तुला जाणीवपूर्वक प्रश्न विचारला होता,की कौस्तुभ या भूमिकेसाठी इतक्या कसलेल्या नट्या तुझ्या ओळखीत पडलेल्या असताना तू माझी का निवड केलीस? तर तू उत्तर दिलं होतंस-तू हे सगळं खरं मानणार नाहीस,म्हणून!तुझी खरोखरची पत्नी व्हायची इच्छा होती माझी;तुला मी काही तासांसाठी– कोणाचीतरी फसवणूक करण्यासाठी पत्नी म्हणून हवी होते!तुझ्या नावानं गळ्यांत मंगळ्सूत्र घालावं,एवढंचस्वप्न होतं माझं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीन तुझ्याबरोबर सात जन्म संसार करायला मी वचनबद्ध व्हायला तयार असताना तू मला खोटं मंगळ्सूत्र घालशील का म्हणून विचारत होतास!’बोलताना तिचा गळा दाटून आला. डोळे भरून आले.

’सॉरी , सर…!- ’‘चिअर्स-!’तिनं ग्लास ओठाला लावला.वास घेऊन पुन्हा बाजूला केला.त्याच्या आशा ठिसूळल्या.‘का, काय झालं?’‘डो’न्ट वरी.मी हा ग्लास संपवणार आहे मिस्टर टंडन.’ ती गंभीरपणे म्हणाली,’कारण,तुम्ही मला इथे कशाकरता बोलावलंय्‌ याची मला पूर्ण कल्पना आहे!जे घडेल, ते बेहोशीत घडून जावं…शुद्धीवर आल्यावर त्याची जाणीवही राहू नये, म्हणून तरी मला हा ग्लास संपवलाच पाहिजे.पण शुद्धीत असताना मी काय सांगते ऐकून ठेवा.माझ्या किरणला आज नोकरीची गरज नसती तर…थोड्या वेळानं जो देह तुम्ही विवस्त्र पाहणार आहात मनसोक्त उपभोगणार आहात…त्या देहाचं नखसुद्धा तुमच्या दृष्टीस पडलं नसतं!पण माझ्या दुर्दैवानं,दान तुमच्या बाजूचं आहे.त्याला नोकरीची नितान्त आवश्यकता आहे. म्हणूनच आजच्या रात्रीपुरता हा देह तुमच्या स्वाधीन करणार आहे!’असं म्हणून तिनं ग्लास तोंडाला लावला.गटागट पिऊन टाकला तो आवाक्‌!त्याच्या हातातला ग्लास तसाच.‘घ्या मिस्टर… घ्या !अपराधाची बोचणी लागून मजा किरकिरा होणार नाही म्हणजे!’त्यानं निमूटपणे ग्लास उचलला.संपवला.

…’न्याय-अन्याय’- तपासाची सूत्रं अशोक फडकरच्या हाती जायला नको होती!डिपार्टमेंटचा हा एक माणूस टेरर आहे. नसलेलं सूत निर्माण करून,त्या वरुन स्वर्ग गाठण्यात त्याचा हात कोण धरणार नाही!आणि पोलिस आहे का कोण हो! साला औषधाला पैसा खाईल तर शपथ!-हे फार वाईट!म्हणजे, हा या ना त्या प्रकारे योग्य मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचला,तर…!दिवाभीतीचं आयुष्य-या शब्दाचा अर्थ मला तेव्हा खऱ्या अर्थाने कळला! दारावरची बेल वाजली की,माझे हात-पाय गळायचे!कामाच्या ठिकाणी कोणी हाक मारली की,खपकन्‌ हृदय बंद पडायचं!माझं नशीबच थोर,म्हणून या काळात माझी न्‌ फडकरची कुठे समोरासमोर गाठ पडली नाही! तरंगिणी गेली…ऐन तारुण्यात गेली….अशा प्रकारे गेली…तिच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत.सगळं मला मान्य होतं.झाल्या प्रकाराबद्दल मला दु:ख वाटत होतं.मन:पूर्वक पश्चातापही होत होता.पण असा विचार करा-मी काही कोणी सराईत खूनी नाही. सायकिक तर त्याहून नाही.किंबहुना,गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल मला स्वत:लाच चीड आहे.मग,मी न सापडल्याने,एकमोठा गुन्हेगार मोकळा रहातो,अशातला भाग नाही,हे तुम्हीही मान्य कराल. कसं घडलंते मी तुम्हाला हातचं काहीही न राखता सांगितलंच आहे. तरंगिणी तर गेली. आता,मी माझे प्राण वाचवायला प्रयत्न केला तर, त्यात चूक काय आहे? हा मुद्दा लक्षात येताच, माझं डोकं विचार करायला लागलं.फडकर कसा तपास करतो- त्याला काय मिळतं…नुसतं पाहात बसून चालणार नाहीये! पुराव्या अभावी पोलिसांनी केस फाईल केली तरी डोक्यावर आयुष्यभर टांगती तलवार राहिल!त्यापेक्षा, आपणच फडकरला आपल्या दृष्टीनं सुरक्षित अशी शोधाची दिशा दिली पाहिजे. खटला निकाली झाला पाहिजे! दोन दिवस मी त्याच विचारात होतो. आणि तिसऱ्या दिवशी माझ्या विचारांना दिशा मिळाली. तो-एल्‌.आय्‌.सी.डेव्हलपमेंट ऑफिसर! काही इलाज नाही! तो या प्रकरणा संदर्भात तरी इनोसन्ट आहे,हे मला माहित आहे. पण, माझी मान निश्चित्पणे वाचवायची असेल तर, त्याची पक्की अडकणं आवश्यक आहे! निर्णय घेताना मला वाईट वाटलं खरं; पण शेवटी…न्याय-अन्याय…सगळ्या टर्मस्‌ सापेक्षच की!

दुनियादारी – तुझं प्रेम हे आकाशाइतकंच खरं नि सर्वव्यापी आहे रीन जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपण आकाशाच अस्तीत्व नाकारू शकत नाही पण रीन, म्हणुन कोणी आकाशाखालीच निवारा शोधत नाही! त्यासाठी घराच्या अस्तित्वाची गरजही तितकीच प्रखर असते! तु माझ आकाश आहेस श्रध्दा माझा निवारा आहे! मी तुझं आकाश आहे; धीरुभाई तुझा निवारा आहे आकाशानं आकाशाइतकचं भव्य राहावं रीन त्यानं कोणाच्या निवाऱ्याचं छप्पर होउ नये!

क्षितिज’ – माफ करा विश्वासदा!तुम्ही दिलेलं हे बक्षीस मी आजपर्यंत अभिमानाने जपलं कसेही प्रसंग आले तरी ते काधून टाकण्याचा विचारही माझ्या मनात डोकावला नाही.पण…आज मी ही सिगारेट-केस लायटरसह विकू इच्छितो!सारं जग-विश्वाचे सारे मानवी व्यवहार भाकरीच्या एका चतकोरात सामावतात, हेआज मला पटलं.तुम्हाला पटलं तर तुम्हीही मला माफ कराल!तुम्ही उत्स्फूर्तपणे दिलेली ही छोटीशी भेट विश्वासदा,या भेटीच्या रुपानं एकदा सारं विश्व मुठीत बंदिस्त झालं होतं.सारी इन्डस्ट्री तेव्हा पायाशी असल्यासारखं वाटलं होतं.भविष्याच्या स्वच्छ निळ्याभोर आकाशात एक सप्तरंगी क्षितिज-रेषा दृष्टीपथातआली होती. पौर्णिमेचा उगवता चंद्र असा हात लांब करुन हातात घेण्याइतका सहजप्राप्य वाटावा,तशी ही क्षितिज-रेषा चार पावलांवर भासत होती.या रंगीत क्षितिजावर एक दिमाखदार,टप्पोरा तारा स्वयंतेजाने तळपत होता.कीर्ती…पैसा…मानसन्मान…असे त्याचे कितीतरी पैलू नजरेच्या टप्प्यात होते.वाटलं होतं, या क्षितिज-रेषेपाशी लवकरच आपल्याला पोचायचं आहे.मग तो उगवता तारा हळूच स्वत:हून खुडला जाईल.आपल्या माथ्यावर विराजमान होईल.आता मला कळलं आहे विश्वासदा;तुम्हाला कळलं आहे का?कोणत्याही अतृप्त कलावंताची अधाशी नजर अशाच एका क्षितिज-रेषेवर खिळलेली असते .या रेषेवर एक तारा असतो .या तार्‍याचं प्रतिनिधीक रूप म्हणजेच कलेतला आपला आदर्श.या आदर्शांपर्यंत पोहोचणं,हेच आपल्या कला-जीवनाचं ध्येय.सांगता.हा तारा हासिल करण्यासाठीच कलाकार तन-मन-प्राण पणाला लावून आयुष्यभर झिजतो,कष्ट घेतो.पावलाला शेकडों जन्मांची तपश्चर्या करीत या क्षितिज-रेषेकडे सरकत राहातो.आणि…क्षितिज हाती लागत नाही; ताऱ्याची जागा सापडते,तर ताराही पुढे सरकलेला!किती चमत्कारीक आहे हे विश्वासदा!या ताऱ्याची नजरही दूर कुठेतरी स्थिरावलेली असते.त्याच्या नजरेसमोरही,त्याच्यापुरती दिसणारी अशी एक क्षितिज-रेषा असते.तिथेही एक दैदिप्यमान तारा लखलखतअसतो.आणि ती जागा मिळत नाही म्हणून आपला तारा असमाधानी असतो. दु:खी असतो.कष्टी असतो.उदास असतो.प्रत्येक कलाकाराचं क्षितिज असं त्याच्या दृष्टीपथात;हाती मात्र येत नाही!

स्वीकृत’ -का गं झोप नाही लागत का?’प्रश्न उत्तर देण्यासाठी नव्हताच. नि:शब्दपणे ती त्याच्या शेजारी येऊन बसली. सिगारेटचा देखणेपणा ऐटीत जळत तिचं पार थोटूक होईपर्यंत ती पहात राहिली. मग त्यानं ते थोटूक रस्त्यावर उडवलं.रस्त्याच्या मध्यावर पडून ते रागावल्यासारखं भकभकत राहिलं. धुराची एक अशक्त रेषा सरसरत राहिली. हेच माणसाचं जीवन. आयुष्यभर असं जळत राह्यचं…नाहीतर विझून राख होऊन जायचं! मागे शिलकीत काहीच नाही शेवटी!मी कोण, कोठुनि, कशास्तव येथ आलो?ही इंद्रिये धरुनि सज्ज कशास झालो?क र्तव्य काय मज येथ करावयाचे?-मेल्यावरी तरि कुठे, मज जावयाचे?…कोण?कशासच उत्तर नाही आपल्यापाशी. अगदी प्राथमिकसुद्धा!एका स्त्रीच्या आणि वासनेतून…त्यांच्या कामक्रिडेचं फळ म्हणून…त्यांची इच्छा म्हणून जन्माला आलो. कोणाच्या न कोणाच्या आधारे जळत…जाळत मोठा झालो.का? कशाकरता?…डोन्ट’ट नो!एका स्त्रीला य:कश्चित गर्भ देऊ शकत नाही आपण… या प्रश्नांच्या अंतापर्यंत काय पोहोचणार?

सूत्रबद्ध् - एकदा संबंध येण्यापूर्वी ,तो येऊ न देण माणसाच्या हातात असत. एकदा संबंध आला की,’आपण एकमेकांची ओळख विसरुन जाऊ! हेही चालत नाही! एकदा माणूस कळला की आपल्या किंवा त्याच्या अंतापर्यंत तो असतोच! ’

काळंबेरं’ - आत…आत,जंगल-गाभ्यात खोल…खोल शिरत…अखेर मी त्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो! वृक्षतोड करुन,सोयीनं तयार करुन घेतलेलं मैदान.त्यात,आपली कबर कोणती,ते मृतालाही आता ठामपणे सांगता येणार नाही,इतक्या त्या मेलेल्या…पडझड झालेल्या…रंगावर धुळीचे लोट बसलेल्या…स्वत:ची ओळख हरवून बसलेल्या कबरी…आणि,एक चबुतरा!तो मात्र तुकतुकीत,स्वच्छ!कबरी तशा फारशा नव्हत्या.’किती आहेत?’असं मनाशी विचारत,मी पुढे येताना त्या मोजूनही टाकल्या!एक…दोन…ती चौथी…सहा…सात…दहा!दहा!हा आकडा कबरींच्या संदर्भात मला परिचयाचा वाटला.जणू,कबरी म्हटलं की,त्या एका जागी दह-दहाच्या बंचमधेच असणार!मग,अगदी अचानकपणे,या ’दहा’चा संदर्भ लागला;आणि मी नखशिखान्त शहारलो.दहा!अली-बंधू अकराजण होते.पैकी,सादिक एकटा जिवंत आहे!दहा भावांच्या दहा कबरी!आणि… हा चबुतरा राखीव-अकराव्या कबरीसाठी?या क्षणी तो संपूर्ण रिकामा होता.


सु. शिं.च्या कविता



यूँ तो हर लम्हात एक बहाना है

दिल के रोने को ए दोस्त

मगर रंज है तो सिर्फ़ इस बात का के

हर कोई अपनी ही किसी बात पे रोता है

वही से एक दर्दभरी दास्ताँ शुरू होती है

………………………………………………………………



आत्ताच कशास्तव

सामोरा आलास

नुकताच कुठे मी

नीट घेतला श्र्वास

दर आठवणींनी

छिन्न-छिन्न होताना

होतास तू, अन

तुझाच होत भास!

………………………………………………………………



कधी एकदा

माझ्यासाठी...

पोर्णिमेचा शीतल चंद्रमा

नक्षत्रभरल्या रात्री

चांदण्यांची बरसात

उगवतीचा रक्तिमा

मावळतीचे क्षितीज रंग

नि,

सारंच काही

तिष्ठत होतं

मी साला

माझ्यात नशेत!

अन आता

मी तिष्ठत आहे,

सीमा-रेषांवर-

ती स्वप्न-पाखरं

पुन्हा भेटावीत

म्हणून!

……………………………………………………………



'असीम-जीवन पथ चालताना-

तुझे पाय थकणार नाहीत का?

माझा सगळा आनंद...उत्साह घे;

मला तुझ्या साऱ्या जखमा...दु:ख दे.

---मी तर तुझी सावलीच आहे रे,

चालण्याची शक्ती तुलाच हवी आहे!'

………………………………………………………………



शब्दांत सारं काही

सांगायचं नसतं,

तरीही, सारं काही

'सारं काही' असतं!

तुला काय वाटतं-?

नि:शब्दालाही

अर्थांचे घुमारे फुटावेत...

निरर्थकही सार्थ व्हावं...

असं

शब्दांपलीकडलं

काही असतं, का

काहीच तसं नसतं?

………………………………………………………………



एक कविता तुझ्यासाठी

लिहिन,कधी म्हटलं होतं.

एक गीत तुझ्यासाठी गाईन,

कधी म्हटलं होतं!

हजारो कविता लिहिल्या...

शेकडों गीतं गायिली...

तेव्हा नाही;

तेव्हा नाही, आणि

आताच का ती आठवण

मनातली कविता मालवल्यावर...

भैरवीचेही सूर विरल्यावर...

………………………………………………………………



'ती कळि परवाची,फूल कालचे झाले!

गर्वाने वार्‍यावरति डुलू लागले-

क्षिति नाही उद्याची,तमाहि नाही फार;

निर्माल्य आज ते-

निर्माल्य आज ते,उडले वार्‍यावर!'

………………………………………………………………



'आज तुझ्या आठवणीत

आयुष्यातला

एक-एक क्षण...

मी विसरत आहे!

विसरते क्षण...
पसरत्या आठवणी...

सारं काही

'तुझंच आहे!...तुझंच आहे!

………………………………………………………………



'रंगवुनि स्वप्न माझे-

निघुनी का गेलास तू?

जीवनाचा अर्थ मजला

सांगुनि गेलास तू!

जीवनाचे चित्र माझ्या

आज मी रे रेखिले!

रंग त्याचा होऊनी अन्‌

उडूनि का गेलास तू?

मूर्ति तव मी नयनि माझ्या

होती रे रेखाटली-

अश्रुधारा होऊनी अन्‌

निघुनी का गेलास तू?

चित्र अपुरे...स्वप्न अधुरे

सांग रे फुलवू कशी

मीलनाची आस मज का-

लावूनि गेलास तू?'
………………………………………………………………




आता आपण जाणून घेऊया सुहास शिरवळकर यांच्याविषयी व त्यांच्या दुनियादारी या कादंबरी विषयी अनेकांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया :


महेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया :


अचानक एक नविन वादळ आलं सुहास शिरवळकर नावाचं.. एक पुस्तक होतं , दुनिया दारी .. मला वाटतं मी ते पुस्तक 2001 मधे वाचलंय.. अन खरं सांगतो. .. त्या पुस्तकाने अक्षरशः मनातुन हादरलॊ होतो. सगळे कॅरेक्टर्स अगदी रोजच्या पहाण्यातल्यासारखे. मग तो श्रेयस असो किंवा दिग्या.. ह्या पुस्तकामुळे वाचनाची “चव” बदलली. अन झपाटल्या सारखी सुहासची सगळी पुस्तकं वाचुन काढली. या पुस्तकामधे अगदी कट्टा ते मारामाऱ्या सगळं काही होतं . ते दारु पिणे जे आजकालचा लपुन छपुन करतो ते अगदी कथानकाच्या ओघात आलेले आहे आणि कुठेही मुद्दाम जोडले आहेत असे वाटत नाही. सोबत शिवराळ भाषा पण येते . शिव्या वाचतांना आपण काहितरी वेगळं ,अडखळल्यासारखं किंवा विचित्र वाचतोय असं वाटंत नाही. सगळे शब्द वाक्यामधे अगदी चपखल बसले असतात. . तरुणांच्या रोजच्या बोलण्यातली भाषा वापरल्यामुळे सगळे प्रसंग अगदी आपल्या समोरच घडताहेत असे वाटते. श्रेयस च्या जागी आपणच आहोत अन दिग्या पण आपलाच एक मित्र आहे अन सगळं कथानक आपल्या भोवतीच घडतंय असं फिलिंग येतं….दुनियादारी वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवायचं पुस्तक आहे.. जो पर्यंत तुम्ही ते उघडत नाही, तो पर्यंत ठिक आहे, पण एकदा उघडलं की मग मात्र संपवल्या शिवाय ठेवणार नाही ह्याची मला खात्री आहे. म्हणुन जर वाचायला वेळ असेल तेंव्हाच हे पुस्तक उघडा…पुस्तक वाचुन झाल्यानंतर मात्र एक सुन्न करणारा अनुभव येतो.. कॉलेजात जाणाऱ्या मुलाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे हे.. ’दुनियादारि’ला …हे पुस्तक वाचल्याशिवाय कॉलेज लाइफ सुरु करुच नये असे मला वाटते. तसेच प्रत्येक पालकानेही हे पुस्तक वाचल्याशिवाय त्यांनाही तरुणांच्या दुनियेचा अंदाज येणार नाही.जरी आज कॉलेजात जाणाऱ्या मुलांनी हे पुस्तक वाचलं तरी त्यांना असं वाटेल की सगळ्या घटना अगदी आपल्या सभोवतालीच घडत आहेत असे वाटेल.. आणि हेच त्या पुस्तकाच्या यशाचे रहस्य आहे. अहो बघा ना, २५ वर्षांपुर्वी लिहिलेलं पुस्तक अजुनही वाचतांना ताजं तवानं वाटतंय.


या कादंबरीतून शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे,माणसाने निर्व्यसनी असावे,सभ्य असावे (सभ्यतेचा बुरखा पांघरुन मिरवलेला सभ्यपणा नाही तर बोलण्या बागण्यात,कॄतीत असलेला सभ्यपणा), माणसाला आयुष्यात ध्येय असावे आणि ते मिळवण्यासाठी निवांत पणे चालतांना आयुष्याच्या प्रवासाचा आनंदही माणसाने घ्यावा,भूतकाळातील प्रेमासाठी झुरण्यापेक्षा जोडीदारावर नि:स्सीम प्रेम करुन त्याला मनापासून साथ देऊन खरे प्रेम करावे.


संदिप चित्रे यांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया :
कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं. खरं तर प्रत्येकानं college मधे असताना दुनियादारी वाचायलाच हवं. शिरवळकरांनी एक-एक पात्र काय अप्रतिम रेखलं आहे. College life मधली सळसळ म्हणजे दुनियादारी ! रोमँटिक तरूणाईची दुनियादारी ! भग्न प्रेम म्हणजे दुनियादारी ! अस्सल शिव्या, मारामारीची दुनियादारी ! वास्तवाचं भान देणारी दुनियादारी ! ह्या सगळ्यापेक्षा दशांगुळं वर म्हणजे कोवळ्या वयात चुका होऊ न देणारी दुनियादारी !!!



राजे यांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया :

दुनियादारी कुठून सुरु व कुठून समाप्त हे कळतच नाही हे वास्तव आहे, कुठल्याही पात्राच्या जागी तुम्ही स्वताला पहाणे हे यश आहे ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे. भन्नाट वेग व एकापेक्षा एक सरस व्यक्ती हेच ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे यशाचे कारण. कोण कुठले श्रेयस , डिएसपी, अशोक, एम के, श्री, नितीन, साईनाथ, सुरेखा, मिनू, शिरिन , मिस्टर व मिसेस तळवळकर, कोण अशोकची आई व कोण दिन्याची फॆमेली, कोण जाणे कुठले एसपी कॊलेज पण आपण वाचनाता अचानक गुरफटले जातो व वाटते अरे आम्ही तर ह्यांना ओळखतो जर जवळून नसेल तर दुरुन सही पण आम्ही ओळखतो सर्वांना, पुस्तक वाचण्याआधी व वाचल्यानंतर आपले भावविश्व एकदम वेगळे होऊन जाते, आपण का जाणे अचानक एका वेगळ्याच विश्वामध्ये रमतो, जो आपल्याला नेहमी खटकत असतो जिवनामध्ये तो पण आपलासा वाटू लागतो त्याचा चुकीचा दृष्टीकोन देखील आपण जरा तपासून पाहू लागतो., मित्र, कॊलेज, मारामा-या व तो संतोष बार पाहिला नाही असे नाही कुठे ही जा कोल्हापुरात, पुण्यात अथवा अस्सल दिल्ली मध्ये नाहीतर कानपुरमध्ये सर्वत्र हेच मग ह्या पुस्तकात असे काय आहे ज्याने मला वेड लावले तर ते आहे प्रत्येक व्यक्तीरेखेचे भावविश्व.अरे वाचताना हदयावर खड्डे पडतात यार हेच यश. चार पानं हसण्याची तर चार पानं निरंतर अश्रु ढाळण्याची, माझ्या मित्रांनी मला कधी एवढे इमोशनल पाहिले नव्हते ते जरा चरकलेच पण हा एक पुस्तक इफेक्ट आहे हे कळाल्यावर चार शिव्या देऊन गप्प झाले पण मी गप्प होऊ शकलो नाही, डोक्यात कुणाला दोष द्यावा हाच विचार चालू होता व आहे. श्रेयस तळवळकर, हा तुम्हाला कुठे ही भेटेल अगदी तुमच्या जवळपास वावरत असेल, नाव दुसरे असेल पण व्यक्ती तीच, घरात प्रॊब्लेम म्हणून हॊस्टेलवर / रुम वर पडिक, मित्रांमध्ये रमलेला, हुषार, हजरजबाबी, स्पष्ट व मनमोकळा, मनाने सच्चा पण काय करावे हेच माहीत नसलेला व अनुभवाच्या जोरावर दुनियादारी शिकलेला. मीनू एक नजर काफी, आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणारी, प्रियकराच्या मैत्रीणीवर जळणारी व आई वडिलांचा दबाव म्हणुन अचानक प्रियकराच्या जिवनातून जाणारी अशी मिनू तुम्ही देखील कधी ना कधी पाहिलेली, अंगात रग असलेला पण रस्ता माहीत नसलेला, मित्रांसाठी जिव देणारा व घेणारा पण स्वत:चे काय ह्याची फिकिर नसलेला डि एस पी देखील तुम्हाला कोप-या कोप-यावर भेटेल, मित्रांना नेहमी हसवणारे / प्रत्येक वेळी साथ देणारे नितीन, मध्या व श्री देखील भेटतील, तसेच मित्रांना दगा देणारा अशोक व साईनाथ नावाचे प्राणी देखील आपल्या आसपास भेटतीलच. कुठल्याही बार वर जा तुम्हाला एम के जरुर भेटेल जरा स्वभाव निराळा असेल पण बाकी सगळे सेम. नातेगोती कधी अश्या क्षणाला पोहचली की जेथे तोंड दाखवायला जागा राहिली नाही की मनमोकळेपणा अशी अनेक जोडपी आपलाला आसपास दिसतील. ह्या पुस्तकात आहे तरी काय ? ह्या 315 पानी पुस्तकात एक कॊलेज आहे, एक कट्टा आहे, काही मित्र आहेत काही मैत्रीणी आहेत, आई-वडील आहेत एक एमके आहे व एक त्याची कोणीच नसलेली पण सर्व काही असलेली स्त्री आहे, प्रेमाच्या अथांग सागराला कसा वळसा देणे आहे हे माहीत असलेली शिरिन आहे तर नात्यांना किती किंमत द्यावी हे माहीत असलेला तीचा भाऊ आहे, प्रेम म्हणजे एक दरी आहे व दरीच्या काठावर उभे असलेले सुर्यास्त व सुर्योदय निहारत असलेले जोडपे आहे तर प्रेम म्हणजे काय माहीत नसलेली व एका मुर्खाशी लग्न करायला एका पायावर तयार असलेली प्रियसी देखील आपल्याला भेटते. प्रत्येक जण वेगळा पण एकमेकाशी जुडलेला ह्या ना त्या कारणाने. लहानपणापासून आई-वडिलांच्यापासून दुरावलेला एक मुलगा, वडिलांच्या इच्छे खातिर लग्न केलेली व प्रेमाचा बळी देलेली आई, बायको दुस-यावर प्रेम करते हे माहीत असून देखील लग्न केले व लग्न टिकवण्याचा व नाते जपण्याचा निरंतर प्रयत्न करणारा पती, पतीने धोका दिला म्हणून विचित्र अवस्थेत प्रियेसी, स्वत:ला प्रियतमे ने सोडला म्हणुन निराशेच्या गर्तेत डुबक्या मारणारा एम के, एक गावगुंड पण मनात दोस्तीचा दर्या असलेला व मनाने हळवा डिएसपी व त्यांचा अफाट मित्रसंग्रह.

मनोज यांनी आपल्या ब्लॉगवर मांडलेल्या प्रतिक्रिया :

"सु.शि." म्हणजेच सुहास शिरवळकर. कित्येक तरुण वाचकांचे एक आदर्शवादी लेखक. कारण ऐन तारुण्याच्या उंबरठयावर पाऊल ठेवणा-या प्रत्येक तरुणाला वास्तववादि "दुनियादारी" ला सामोरे जावे लागत असते आणि त्या उंबरठयावर असतांना काहि तरूणांना आयुष्यभराच्या वाटचालीसाठी योग्य वाट सापडते तर काहि हिच वाट चुकतात आणि कुठेतरी दुरवर भटकत जातात. याच वयात कॉलेज जिवनात लागणा-या वाईट संगती आणि सोबत, कुणाबद्दल तरी मनात वाटणारं आकर्षण किंवा प्रेमही खुलत असतं. अशा या प्रत्येक तरूण मनाच्या आयुष्यात येणा-या एका पर्वाला सु.शिं.नी आपल्या "दुनियादारी" या कादंबरीतुन इतक्या बखुबीपणे मांडले आहे की, त्याबद्दल कितीही बोलले तरी शब्द तोकडे पडतात. हा माझा स्वानुभव आहे की, दुनियादारीची थोडिशी कल्पना कुणाला दिली तर ऐकणा-याच्या मनात त्यासंबंधी प्रचंड कुतुहल व त्याचसोबत कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि त्यानंतर सुरु होतो दुनियादारीचा शोध. प्रातिनिधीक स्वरुपातल्या कादंबरीचा अथवा वास्तवातल्या दुनियादारीचा.प्रत्येक मुलाच्या वा मुलीच्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रीणी येत असतात. परंतु त्यांची व्याप्ती किती..? असे विचारले तर ते मात्र चटकन कुणाला काही ठरविता येत नाही. अशाच प्रकारे या कादंबरीतुन अजरामर झालेला एस.पी. चा कट्टा आणि त्या कट्ट्यावरची वरकरणी टवाळ दिसत असणारी " कट्टा गँग" मनातून किती प्रेमळ आणि मवाळ आहे याचं दर्शन घडते.या कट्टयाचे सदस्य- दिग्या (डि.एस.पी), श्रेयस, अश्क्या, उन्म्या, नित्या, मध्या, श्री, प्रितम पटेल.मुली- शिरीन, मिनू, सुरेखा, आशा, पुष्पा.विरोधी पण महत्वाचे- साईनाथ, शशिकला.आणि या व्यतिरिक्त- एम.के.क्षोत्री, रानी मां, डॅडी, धिरुभाई.सर्वच पात्रे कशी आपल्या सभोवताली सापडणारी आहेत. त्यामुळे ही दुनियादारी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. हे सारे कसे एकसंध आणि आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देणार असे गृहितक मांडुन चाललेले."शोधा म्हणजे सापडेल" अशी एक उक्ति आहे... त्याप्रमाणे थोडया वेगळ्या स्वरूपात बोलायचे झाले तर मी म्हणेल, " पहा म्हणजे सापडेल" आपल्या समोर येणा-या प्रत्येक व्यक्ति मधे ही पात्रे इतकी सहजपणे सापडतात... की क्षणभर तुम्हाला स्वत:ला वाटते, आपण पण ही दुनियादारीच तर जगत नाही आहोत ना....!"शिरीन" या अनुभवसंपन्न मुलीबद्दल काय बोलावे..? कादंबरीचा हर एक पुरुष वाचक त्याच्या आयुष्यात आलेल्या कुण्या खास व्यक्तीशी शिरीनची तुलना केल्याखेरीज रहात नाही... तिचे एक वाक्य मनाला खुपच लवकर भिडते. ती म्हणते," आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते, परंतु तिची वेळ मात्र चुकीची असते." या वाक्यातला खोलवर असलेला विचार शिरीनच्या मुखातून निघालेला असला तरी तो मुळात सु.शिं.च्या ह्रदयातुन आलेला आहे, हे विसरुन कसं चालेल...!एम.कें.चं जगण्याचं स्वत:चं वेगळं असं एक तत्वज्ञान ... त्यांचं ते दर्दी आणि थेट काळ्जात हात घालणारं बोलणं... रानी मां म्हणजेच पुर्वीच्या मीरा सरदेसाई चं दु:ख... हे सारं मनातुन काढुन कागदावर उतरविणारे आपले सु.शि.दुनियादारीचं सार काढुन ती कोळुन प्यायल्यास क्वचित प्रसंगी आयुष्य जगतांना कुणाला काही त्रास होईल असे मला वाटते. अन्यथा या विचारांच्या आधारे स्वत:चं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ करुन घेण्यास प्रत्येक वाचकाला मदत होते.तेव्हा अशी ही दुनियादारी प्रत्येकाने जपा, जगा. हीच एक अपेक्षा...

मित्रांनो,

"दुनियादारी"दुनियादारी...रानी मां मधीलगुढ एका आईची,डॅडिंनी वाळीत टाकलेल्यामुलाच्या नात्याची...
दुनियादारी...मिनू की शिरीन...?या पडलेल्या कोड्याची,मोठा होऊन सुध्दा"चाईल्ड" असणा-या श्रेयसची...
दुनियादारी...चाकु, तलवारी, राडा हे सारं सारं विसरुन,प्रेमात, रांगड्या वाघाचं मांजर झालेल्या दिग्याची...
दुनियादारी...एका टोणग्यावर मनसोक्त प्रेम करणा-या,अण्णांच्या धाकामुळे स्वप्न चुरगळणा-या सुरेखाची...
दुनियादारी...भित्रा, घाबरट दगाबाज अशा अश्क्याची,अनुभव कोळुन प्यायलेल्या प्रितम अन शिरीनची...
दुनियादारी...मध्या, श्री, नित्याया सा-यांच्या दोस्तीची,हुशार अन हजरजबाबी विनोदी कोडे घालणा-या उन्म्याची...
दुनियादारी...संधी मिळताच गेम करणा-या संधीसाधु साईनाथची,वासनेपोटी माजलेल्या गंडविणा-या शशीकलेची...
दुनियादारी...लग्न म्हणजे पोरखेळ समजणा-या मनीषची,तर कॉलेजात शिकतांना मास्तरवरच प्रेम करणा-या सुधेची...
दुनियादारी...दु:ख दारुत बुडवून तशीच पोटात रिचविणा-या,भावनाशुन्य झालेल्या महान अशा एक.के.क्षोत्रींची...
दुनियादारी...वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत राहणारी,सर्वांची आवडती कधीही न संपनारी...तुमची, आमची ...दुनियादारी...दुनियादारी...दुनियादारी...

---------------------------------------------------------------------------------------
मी पण असाच आहे फाटका
एमके माझ्यामध्ये देखील वेगळा
कधी डिएसपी माझा मित्र होता वेगळा
तर कधी मिनू, शिरिन मध्ये मी गुरफटलेला
कधी प्रेमामुळे रक्तबंबाळ
तर कधी दारुमुळे झालेली आबाळ
मी असाच एक श्रेयस
दुस-याला दुनियादारी शिकवता शिकवता
अचानक दुनियादारी शिकलेला
हरवलेल्या मित्रांमध्ये कधी
श्री तर कधी नितीन शोधत असलेला
संतोष बार च्या अंधा-या टेबलवर
दुनियादारीचा हिशोब मांडलेलामीच तो एम के कधीश्रेयस असलेला !

सुशिंचा स्मृतिग्रंथ प्रकाशन :


तिथे सगळेच एका ओढीने जमले होते. नेहमीचा पुस्तक प्रकाशनाचा तो सोहळा नव्हता. त्यांच्या आवडत्या लेखकासंबंधीच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन होणार होते. सभागृह भरले होते. दारात, मागे अनेकजण उभे होते. हा लेखक होता सुहास शिरवळकर. शशिदीप प्रकाशनाच्या ‘सुहास शिरवळकर असे आणि तसे’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार आणि ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. एका अर्थाने शिरवळकरांना त्यांच्या चाहत्यांनी दिलेली मानवंदनाच आहे.मराठी साहित्य क्षेत्रात अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य असा भेद नेहमीच करण्यात आला आहे. सुहास शिरवळकर यांच्यावरही असाच अन्यास करण्यात आला. खरंतर त्यांच्या अनेक कादंबऱ्या अभिजात गटातच मोडणाऱ्या आहेत. मात्र तरीही लोकप्रिय कादंबरीकार म्हणूनच त्यांच्याकडे बघितले गेले.त्यांच्या स्मृतिग्रंथाचे रविवारी प्रकाशन झाले. हा सारा सोहळाच एका वेगळ्या वातावरणात झाला. तिथे जमलेल्या गर्दीचे सुहास शिरवळकर यांच्याशी असलेले ‘अक्षरनाते’ महत्वाचे होते. या अक्षरनात्याच्या प्रेमातूनच ही सारी मंडळी आपल्या आवडत्या लेखकाला सलाम करायला आली होती. सुहास शिरवळकर यांच्यावरील या ग्रंथात सामान्य वाचकापासून ते विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींपर्यंत सगळ्यांनी आवर्जून लेखन केले आहे. या समारंभातही गिरीष दाबके यांनी शिरवळकरांबरोबरच्या स्नेहबंधांना उजाळा दिला. काही किस्से सांगितले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे अत्यंत महत्त्वाचं असं बोलले. ते म्हणाले. माझी आणि सुहासची जेव्हा जेव्हा भेट होई तेव्हा साहित्य सोडून अन्य विषयावर आम्ही बोलत असू, त्याने माझ्या साहित्यावर व मी त्याच्या साहित्यावर बोलायचे नाही अशी आमच्या मैत्रीतील अलिखित अट होती. कालच्या समारंभात ते म्हणाले, सुहासने ‘फलश्रुती’ या पुस्तकात म्हटले आहे की, लोकप्रिय लेखनाच्या फॉर्ममधूनच मी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो.’ सुहासचे हे निवेदन खूप विचार करण्यासारखे आणि समीक्षकांनीही विचार करण्यासारखे आहे. लोकप्रिय लेखकांचीही विशिष्ठ भूमिका असते. हे सुहासने ठामपणे सांगितले. ते खूप महत्त्वाचे असल्याचे ‘हमो’नी सांगितले.द. मा. मिरासदार यांनीही शिरवळकरांच्या लेखनाचा योग्य आढावा घेतला. शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर यांच्या अथक प्रयत्नांमधून हा स्मृतिग्रंथ आकारला आहे. या ग्रंथात शिरवळकर यांच्यासंबंधी विशेष माहिती देणारे ६९ लेख आहेत. शिरवळकर यांच्या अफलातून अशा कादंबऱ्यांचे व त्यांच्या लेखनाचे आजही वाचकांवर जबरदस्त गारुड आहे. या पुस्तकप्रकाशनाच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या नव्या पुस्तकाच्याबरोबर शशिदीपने शिरवळकरांची जी पुस्तके प्रकाशित केली आहेत त्याच्या प्रती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. अनेकांनी यातील काही प्रतींची आवर्जून खरेदी केली.सुहास शिरवळकर यांचे अचानक झालेले निधन हे सगळ्यांनाच चटका लावून जाणारे असे होते. शिरवळकरांनी आपल्या लेखनातून मोठा मित्रपरिवार गोळा केला होता. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व त्या निवडणुकीपासून ते नेहमी दूर राहिले पण रसिकांच्या मनावर त्यांचे अधिराज्य होते. त्या ओढीनेच सगळेजण तिथे आले होते. खरंतर शिरवळकर आज असते तर त्यांची साठी मोठय़ा उत्साहात साजरी झाली असती. पण नियतीला ते मंजूर नव्हते. अत्यंत घरगुती अनौपचारिक अशा या सोहळ्यात रसिकांची जी गर्दी होती ती शिरवळकरांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारी होती. शिरवळकर यांना जाऊन सहा वर्षे झाली पण ते गेल्याच्या घटनेवर कुणाचा आजही विश्वास बसत नाही. शिरवळकरांची लेखणी वेगळीच होती. त्यामुळे त्यांना चिरंजिवित्व लाभले. कोणतीही जाहिरात न करता त्यांच्या वाचकांनी काल गर्दी केली होती. शिरवळकर यांच्या अन्य पुस्तकांप्रमाणेच स्मृतिग्रंथांच्या आवृत्यावर आवृत्या नक्की काढाव्या लागतील कारण शिरवळकर यांच्याशी जोडलेल्या अक्षरनात्याचे ते शब्दरूप आहे. त्यालाही शिरवळकरांच्या अन्य पुस्तकांचे भाग्य लाभणार यात शंका नाही.

लोकसत्ता मध्ये छापून आलेला पत्रकार विनायक लिमये यांचा त्यांच्यावरील लेख :


वाचनरंग: साहित्यवार्ता : ‘सुशि’ यांच्यावर स्मृतिग्रंथवाचनसंस्कृती म्हणजे एखादे पुस्तक किंवा एखादा लेखक व त्याचे साहित्य इतक्यापुरतेच मर्यादित नसते. अनेक लेखक, वेगवेगळे साहित्य एकत्र येऊन होणारा महासागर म्हणजे वाचनसंस्कृती होय. वाचनसंस्कृती जोपासली जावी यासाठी एखाद्या लेखकाचे समग्र वाङ्मय किंवा त्या लेखकासंबंधीचा ग्रंथ महत्त्वाचा ठरत असतो. लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्यासंबंधीचा सु.शि.- सुहास शिरवळकर हा ग्रंथ पुढील महिन्यात प्रसिद्ध होत आहे. जवळजवळ ३०० हून अधिक पृष्ठांचा हा ग्रंथ सुहास शिरवळकर यांच्यासंबंधी व त्यांच्या साहित्यातील मूल्यमापन करणाऱ्या लेखांचा संग्रह आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर, तसेच राजन खान यांनी यामध्ये लेखन केले आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा, अलका कुबल यांनी सुहास शिरवळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी व त्यांच्या साहित्याविषयी यामध्ये लिहिले आहे. छायाचित्रकार दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिका अश्विनी धोंगडे, इब्राहिम अफगाण, राजेंद्र पाटणकर, आनंद यादव, शकुंतला मुळे, निरंजन घाटे या मान्यवरांनीदेखील सुहास शिरवळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या संग्रहात सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर यांचाही लेख आहे. त्याचबरोबर सम्राट शिरवळकर यांनी सुहास शिरवळकर वडील आणि साहित्यिक अशा दोन नात्यांची असलेली जवळीक, याबद्दल लिहिले आहे. या प्रदीर्घ लेखातून आगळीच माहिती समोर येते. शिरवळकरांच्या काही मोजक्या कविता उपलब्ध आहेत. यापैकी ‘कसा मी, असा मी’ ही कविता या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे.अनिल किणीकर यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून, शिरवळकर यांच्या साहित्याविषयी मार्मिक रसग्रहण करणारा लेखही त्यांनी लिहिला आहे. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनीदेखील शिरवळकरांसंबंधी लिहिलेल्या लेखात व. पु. काळेंचे साहित्य आणि शिरवळकरांचे साहित्य व वाचकांवर असलेली या दोघांची मोहिनी यासंबंधी लिहिले आहे. सुहास शिरवळकर यांनी विविध ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत व स्वतविषयी लिहिलेल्या लेखांचेही संकलन या ग्रंथात आहे. एकूणच सुहास शिरवळकर यांना समजून घेण्यासाठी हा ग्रंथ खूपच महत्त्वाचा ठरेल.

महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आलेला त्यांच्यावरील त्यांच्या कवयित्री-पुतणी सुजाता महाजन यांनी लिहिलेला हा लेख :

हजारो चाहते असणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखकांपैकी एक होते सुहास शिरवळकर. ते गेल्याला आता सात वर्षे झाली. पण कधी त्यांच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला नाही. आज पुण्यात अनिल किणीकर यांनी संपादन केलेल्या 'सुहास शिरवळकर असेही-तसेही' या पुस्तकाचे प्रकाशन द. मा. मिरासदार आणि ह. मो. मराठे यांच्या उपस्थितीत होत आहे. सु.शि. या आद्याक्षरांनी वाचक शिरवळकरांचा प्रेमाने उल्लेख करत. त्या सु.शिं.च्या विविध पैलूंचा वेध घेणाऱ्या या पुस्तकातील त्यांच्या कवयित्री-पुतणी सुजाता महाजन यांनी लिहिलेला हा लेख. ............................
देखणा 'सुकाका' घरात सगळ्यांचाच लाडका. काका आमचा लाडका होता. का? तो सतत आनंदी असायचा. जीवनरसाने भरपूर, टवटवीत असायचा. त्याच्या सहवासात दोन-पाच मिनिटे एखादी व्यक्ती आली, तरी चैतन्यानं भारून जायची. त्याचा आवाज चांगला होता. तोंडात सतत गाणी असायची. गाणी म्हणत म्हणत धावत धावत जिने चढणारा उत्साही काका मला अजून डोळ्यांसमोर दिसतोय. पूवीर् तो एका कार्यक्रमात मुकेशची गाणी म्हणायचा. पण असे कार्यक्रम आणि जागरणं, तब्येतीची नासाडी, अनेक व्यसनांच्या शक्यता ही सगळी समीकरणं आमच्या हुशार काकूच्या वेळीच लक्षात आली आणि तिने त्याला या क्षेत्रातून पाऊल मागे घ्यायला लावलं. काकूचं म्हणणं त्यानं अनकेदा मानलं. 'पुरुषांना बायकांनी अक्कल शिकवायची नसते,' अशी वृत्ती त्याच्या वागण्यात कधी दिसली नाही. हे त्याचं वेगळेपण मला आत्ता जाणवतंय. तो संघर्षप्रिय नव्हता. कुठल्याही गोष्टींवर सारासार विचार करून विवेकाने मार्ग काढायची त्याला सवय होती. माझ्या बाबांची आणि त्यांची चांगलीच गट्टी होती. दोघांच्या वयात पुष्कळच अंतर होतं. पण एकूणच आमच्या घरातले लोक वयाला न जुमानणारे. बाबा आणि तो बोलताना त्यांच्या वयात अंतर आहे, असं जाणवायचं नाही. कारण कुणाला बोलण्याचं कुठलं बंधन नव्हतं. समोर लहान मुलं आहेत. हे बोलू नका, ते बोलून नका असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे आम्ही मुलंही वयापेक्षा जास्त शाहणी झालो. पुढे पुढे ते आम्हाला संभाषणात सहभागी करून घ्यायला लागले. बाकीच्या घरांमधलं वातावरण पाहिलं की, जाणवतं की, आपल्या घरात कोणतीच बंधनं नव्हती. बोलण्याची आणि कृतीचीही. दुसरी गोष्ट म्हणजे या माणसांना विशिष्ट भूमिका नव्हत्या. इतिहासाचं ओझं घेऊन ते जगत नव्हते अणि भविष्याचा ताण बाळगून वावरत नव्हते. ते साक्षात वर्तमानात जगत होते. साहित्य आणि संगीत हे अतिप्रिय विषय होते. गप्पा सगळ्या त्यासंदर्भात चालू असायच्या. जोडीला भरपूर विनोद. त्यामुळे जिवंत, खळाळत्या आनंदाच्या झऱ्यात आम्ही न्हाऊन निघत होतो. माणूस जेव्हा परिस्थितीच्या आत असतो तेव्हा त्याला माहीतच नसतं, आपण कुठल्या बेटावर आहोत. इथला प्रकाश, हवा, पाऊस, झाडं-बाहेरपेक्षा वेगळे आहेत की तसेच! आज मला जाणवते, त्या बेटावरची ताजी हवा. आनंदाचे झरे, निरागस, निर्व्याज आणि स्वतंत्र वातावरण. तुलनेने दुसऱ्या बेटांवर आता वेगवेगळ्या भूमिका आहेत. समकालीन जगाचं जास्त भान आहे. जरूरीपेक्षा जास्तच गांभीर्य आहे. काकाच्या लेखनात एक मूल्यसमरणी नकळत होतीच. बालवयात केलेल्या वाचनाचे, ऐकलेल्या कीर्तनांचे, पुराणकथांचे, रामायण-महाभारताचे संस्कार होते. बऱ्या-वाईटाचा विवेक दिसून यायचाच. चेष्टा, मस्करी, विनोद हे त्याच्या जगण्याचा आणि लेखनाचाही अविभाज्य भाग होते. कधी कधी चेष्टा करताना, भाषिक विनोदापोटी कुणाच्या वर्मावर बोट ठेवलं गेलं असेल किंवा विनोदविषय बनलेल्या गोष्टीतलं कारुण्य न दिसल्यानं विनोद थोडा क्रूर बनला असेल. पण ते केवळ विनोदाच्या हव्यासपोटी. त्याच्या वृत्तीत क्रौर्य अजिबात नव्हतं. उलट तो अतिशय संवेनदशील होता. दुसऱ्या माणसाला मदतीची गरज असेल आणि तो करू शकल असेल तर वाटेल तेवढी मदत करायला त्याने कधीच मागे-पुढे पाहिलं नाही. तो स्वत:चा मूल्यवान वेळ द्यायचा, स्वत:च्या ओळखींचा उपयोग करून गरजू माणसाला मदत करायचा. वाचकांनी जसं त्याच्यावर भरपूर प्रेम केलं, तसं त्यानेही वाचकांवर भरपूर प्रेम केलं. त्याच्या कादंबऱ्या वाचून त्याच्यावर प्रेम करणारे उदंड वाचक त्याला मिळाले. ते त्याला मोठमोठी पत्रं पाठवायचे. तो त्या सर्वांचा आदर ठेवून उत्तरं लिहायचा. मग वाचक भेटीची इच्छा व्यक्त करायचे. काका सर्वांना भेटायचा, वेळ द्यायचा, कुणालाही त्याने टाळलं नाही. वाचक स्वत:च्या कहाण्या सांगायचे, रडायचे, तो अत्यंत मन:पूर्वक त्यांच्याशी बोलायचा. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचा. कधी कधी तर त्याला आईवडील-मुलगा, पती-पत्नी, भावंडं अशा नात्यांमध्ये मध्यस्थाची भूमिका देखील निभवावी लागायची. सुकाका हे चालतेबोलते समुपदेशन केंदच होतं. मी लिहिणारी म्हणून काकाची विशेष आवडती. त्याचं पुष्कळसं लेखन मी लिहिल्या लिहिल्या वाचलंय. तो लिहितानाच इतकं काळजीपूर्वक लिहायचा की पुन्हा लिहावं लागू नयं. अतिशय सुंदर हस्ताक्षर, मांडणी उत्कृष्ट, त्यामुळे हस्तलिखित वाचायला मजा यायची. माझ्याशी तो साहित्य क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचा. बारीकसारीक तक्रारीही करायचा. पण आत्ता एक लक्षात येतंय. त्याच्या स्वभावात खासगीपण नव्हतं. म्हणजे माझ्याशी जितकं मनमोकळं बोलेल तितकाच तो अक्षरसुद्धा न वाचणाऱ्या एखाद्या नातेवाईकाशी, एखाद्या दुकानदाराशी, कामवाल्या बाईशी, वाचकांशी, कुणाशीही मोकळेपणाने बोलू शकायचा. विषय भले वेगळा असेल. त्याची शैली प्रसन्न, खेळकर होती. छोट्या छोट्या सुटसुटीत वाक्यरचना, बोली भाषेचा भरपूर वापर आणि संवादात्मक शैलीमुळं त्याचं लेखन कधीही कंटाळवाणं होत नसे. पण समीक्षक आपल्याला महत्त्व देत नाहीत, इतिहासात आपला उल्लेख हेटाळणीने केला जातो, असं त्याला वाटत राहायचं. काळाच्या प्रवाहात प्रत्येकजण अस्तित्वासह एक जागा व्यापून असतो. तो दुसऱ्या कुणाच्या जागी असू शकत नाही आणि दुसरा त्याच्या जागी. पण ही जाण सर्वांच्या भाग्यात नसते. त्यामुळे लोक तुलना करतात. याचं लेखन असंय, त्यांचं तसंय. ठीक आहे. त्यांनी तेच करावं; पण हे काकाला कधीच उमगलं नाही. तो दुखावला जात राहिला. पुन्हापुन्हा. वास्तविक त्याच्यावर हेटाळणीने लिहिणाऱ्या समीक्षकांना जर विचारलं की तुम्ही आधी वाचलंय का? तर बहुतेकांचं उत्तर 'नाही' असायचं. काकाला टीकेपेक्षाही न वाचता केली गेलेली टीका जास्त दुखावून जायची. त्याच्या लेखनाला दहा वषेर् पूर्ण झाली म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. असा कार्यक्रम सहसा कुणी करीत नाही. त्या दिवशी त्याचे सर्व प्रकाशक, लेखकमित्र, वाचक, पत्रकार, चित्रकार असे अनेक हितचिंतक उपस्थित होते. 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या सवेर्क्षणात वाचकप्रिय लेखक म्हणून काकाला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळालं होतं. त्याला मोठे मानसन्मान मिळाले नसतील. पण वाचकांच्या अखंड प्रेमाचा झरा त्याच्या आयुष्यात शेवटपर्यंत झुळझुळत राहिला. तो कधीच आटला नाही. अजूनही येणाऱ्या पिढ्या त्याचं लेखन वाचतायत. त्याच्या लेखनावर प्रेम करतायत. त्याच्या पुस्तकांच्या आवृत्त्या निघतायत. त्याच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट काढता येऊ शकतात. भविष्यात हेही घडू शकेल. तेव्हा कदाचित इतिहासाला त्याची दखल घ्यावीच लागेल


रविप्रकाश कुलकर्णी यांचा सामना या वृत्तपत्रात छापून आलेला लेख


सुहास शिरवळकर हा एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होता. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही.
असा हा लेखक आकस्मिकपणे ११ जुलै २००३ रोजी हृदयविकाराचा धक्का बसून गेला. पण माणूस गेला तरी त्याची आठवण राहते. किंबहुना माणस आठवणीतच जिवंत राहतात. सुहास शिरवळकर यांच्या बाबतीत असंच काहीस झालं. सुहासचे चाहते, मित्र, आप्त, समकालीन सगळेच त्यांची आठवण काढत राहिले.
या अशा आठवाणीचाच संग्रह 'सुहास शिरवळकर - असे आणि तसे' नावाने अनिल किणीकर यांनी संपादित केला आणि शाशिदीप प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे.
राजन खान यांनी नेमकेपणान म्हटलं आहे - 'सुहास शिरवळकरांची न माझी भेट हि पहिल्यांदा, अर्थातच त्यांच्या पुस्तकातूनच झाली. माझ्या पिढीतले जे वाचणारे लोक होते. त्यांच्या वाचनाच्या आयुष्यात सुहास शिरवळकर हे नाव येण हि गोष्ट अगदी अपरिहार्यच होती. बाबुराव अर्नाळकर, एस.एम. काशीकर यांच्या पुस्तकांनी मला वाचनात अडकवलं. वाचन जगण्याचा अविभाज्य भाग झाला. त्यांच्या नंतरचा वाचनाचा जो टप्पा होता, त्यात बाबा कदम, सुहास शिरवळकर हि नावं होती. त्यात सुहास शिरवळकरांनी जास्त जखडून ठेवलं. त्यांच्या विषयामध्ये विविधता होती. भाषेच्या विविध खेळी होत्या. त्यांच्या लिहित्या विषयाला वेगवानपणाही असायचा. भाषेलाही असायचा. वाचनाऱ्याला विषय आणि भाषेच्या प्रवाहात नेण्याची ताकद असायची.'
शिरवळकरांच्या रहस्यकथा म्हणजे अर्थातच त्यांचे नायक फिरोज इराणी, दारा बुलंद, मंदार पटवर्धन, बॅ. अमर विश्वास हे भलतेच लोकप्रिय होते - आजही आहेत. पण एका क्षणी त्यांनी रहस्यकथेला रामराम ठोकला आणि ते सामाजिक कादंबरीकडे वळले. तिथेही त्यांनी तेवढीच लोकप्रियता मिळवली. मात्र या लोकप्रिय लेखकाला साहित्यिक मान्यता मात्र मिळत नव्हती. तसा हा तिढा नेहमीचाच आहे. त्याचे पडसाद या लेखात दिसतात. असे असताना मग या अशा लेखकांना साहित्य प्रांतात कुठे बसवायचं ? त्याबाबत इब्राहीम अफगाण यांनी म्हटलं आहे. 'आपले साहित्यविश्व हे एका इमारतीसारखे मानले तर अभिजात वाड्मय कळस आणि रहस्यकथा व अन्य काल्पनिक वाड्मय पाया आहे. पाया आणि कळसाच्या मध्ये काही सोपान असतात. ते सोपान म्हणजे शिरवळकरांसारखे लेखक. या सोपानामुळेच माझ्यासारखे असंख्य वाचक, लेखक, अभिजात वाड्मयापर्यंत पोहोचले. त्यांना विसरून कसे चालेल ?'
या संग्रहातील विलासदत्त राऊत यांचा लेख अप्रतिम असाच आहे. त्या काळच्या रहस्यकथा युगातला हा एक घटक. राऊत हे सुहासच्या पहिल्या लेखनापासूनचे साक्षीदार. सुहासच्या पहिल्या कथेचं बारस 'गोल्ड हेवनचे गूढ' हे राऊत यांनीच केलं होत आणि जत्रा मध्ये छापण्यास त्यांनीच मदत केली होती. याशिवाय काही खास अंतरंगातली गुपित राऊतांनी उघड केली आहेत. उदा. सुहासचं लेखन हिरव्या शाईत असायचं ( भेलकाचे बेहेरे हिरव्या शाईतच लिहायचे ) हे कसं झालं ? राऊत सांगतात,' माझ्या अंकशास्र व रंगशास्रानुसार काळी शाई बंद करून हिरवी शाई वापरण्याचा सल्ला फलद्रूप झाला.'
या पुस्तकात खुद्द सुहास शिरवळकरांचा एकूणच लोकप्रिय लेखनाबाबतचा दृष्टीकोन त्यांचा आणि इतरांचा, याबाबत प्रदीर्घ लेख आहे. लेखकाचा सल, ठसठस त्यात स्पष्ट उमटली आहे.
आणि हो, सुहास शिरवळकर, दुनियादारी कादंबरी याशिवाय सुशिमहात्म्य पूर्ण होऊच शकत नाही. त्याचे साद - पडसाद या ग्रंथात आहेतच. थोडक्यात सुहास शिरवळकरांबद्दल कुतूहल जाग करणारं आणि त्याबद्दल अधिक काही सांगणार हे पुस्तक आहे.



सुशि’ यांच्या निधनाची महाराष्ट्र टाईम्सने छापलेली बातमी :

मुंबई : रहस्यमय कादंबऱ्यांनी मराठी वाचकांवर दीर्घकाळ भुरळ घातलेले ज्येष्ठ लेखक सुहास शिरवळकर यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. शनिवारी सकाळी सात वाजता तासभर त्यांचे पार्थिव महाराष्ट्र साहित्य परिषदेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरवळकर यांच्या बहिणीचे अलीकडेच निधन झाले होते. तिच्या दशक्रिया विधीसाठी ते शनिवारी पुण्याहून कोकणातील त्यांच्या गावी गेले होते. तेथून ते मंगळवारी अंधेरी येथील त्यांच्या भाचीकडे आले. हिंदी चित्रपटासाठी कथालेखनाचे काम अलीकडेच त्यांनी हाती घेतले होते. त्याबाबत त्यांच्या बैठका सुरू होत्या. त्या आटोपून ते शनिवारी पुण्याला परतणार होते. मात्र सकाळीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना वांदे नसिर्ंग होममध्ये हलविण्यात आले होतेे. लेखन हेच उपजीविकेचे साधन असलेल्या शिरवळकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४९ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षणही पुण्यातच झाले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ' दुनियादारी ' या पहिल्याच कादंबरीला तुफान लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. सुमारे १५० रहस्यमय कादंबऱ्या आणि कोवळिक , वास्तविक , वेशीपलीकडे , यांसारख्या ७१ लोकप्रिय कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. याशिवाय ११ कथासंग्रह , पाच नभोनाट्ये आणि विविध वृत्तपत्रांत त्यांनी विपुल लेखनही केले.

सुशि’ यांच्यावर निधनाची एका इंग्रजी वर्तमानपत्रातने छापलेली बातमी :
Noted writer Suhas Shirwalkar no more
Express News Service
Pune, July 11: NOVELIST Suhash Shirwalkar died of cardiac arrest at a private hospital in Mumbai this afternoon. He was 54 and is survived by his wife and two sons. Known for his detective-thrillers, Shirwalkar had also authored Roopmati, a novel with a historical background, besides short stories, one-act plays and radio plays. Devaki, a Marathi movie based on one of his short-stories, recently won a State award for best story. The writer, who was on a trip to Mumbai, complained of chest pains in the afternoon. He was immediately taken to a hospital where he died while undergoing treatment, family sources said. Shirwalkar’s mortal remains will be kept at the Maharashtra Sahitya Parishad Hall at Tilak Road on Saturday morning to enable literature-lovers to pay their last respects. Final rites will be performed at Vaikunth crematory, thereafter. Duniyadari, a novel tracing the world of college-goers, was regarded a milestone in Shirwalkar’s writings. The creator of characters like Barrister Amar Vishwas, Firoz and Dara Buland in his popular detective thrillers, Shirwalkar also managed to handle topics like medicine and astrology in great detail in his writings. His newspaper columns including Ityadi-Ityadi, Vartulatim Mansa and Phalashruti were well-received by readers.


सु.शि. बद्दल मला इथे म्हणावेसे वाटते की
“ झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु परंतु या सम हा “




सु.शि. तुम्ही आम्हाला सोडून गेलात जर आज तुम्ही असता……… एकदा तरी तुम्हाला भेटायला हव होत हि खंत आता आयुष्यभर राहील..................................................................................... - मिलिंद औटी (एक सुशिवेडा)